भोपाळ – मध्य प्रदेशातील बहुजन समाज पक्षाच्या आमदार रमाबाई यांनी आज भाजपतर्फे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी आमदारांना अमिश दाखविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. गतवर्षी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसने मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करत शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार केले होते. विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण २३० जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक ११४, भाजपला १०९, बसपाला २ तर इतर पक्षांना ५ जागा मिळाल्या होत्या. बहुमताचा आकडा ११६ जागांचा असल्याने काँग्रेस सत्तास्थापनेपासून केवळ २ जागांनी पिछाडीवर होते.
अशातच बसपाने मध्य प्रदेशात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देत बहुमताचा आकडा गाठण्यामध्ये मोठी मदत केली होती. दरम्यान, आता बसपा आमदार असलेल्या रमाबाई यांच्याकडून भाजपवर काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आमदारांना पैशांचे व मंत्रिपदाची आमिष दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना बसपा आमदार रमाबाई यांनी हे आरोप लावले असून त्या म्हणतात, “भाजपतर्फे सर्वच आमदारांना आमिष दाखविण्यात येत आहे. परंतु केवळ मूर्ख लोकच त्यांच्या अमिषाला बळी पडतील. मला भाजपतर्फे मंत्रिपद आणि पैसे ऑफर करणारा फोन आला होता मात्र मी त्यांना स्पष्ट नकार दिला. भाजपचे लोक आमदारांना ५० ते ६० कोटी रुपयांचे आमिष दाखवत आहेत.”
तत्पूर्वी काल भाजपचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्याला मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्यामध्ये कोणतेही स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अशातच आता बसपा आमदार रमाबाई यांनी भाजपवर घोडेबाजारीचे आरोप लावले असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Ramabai, BSP MLA: They (BJP) are making offers to everyone, only fools will come under their influence. I get phone calls offering both Minister berth & money but I have denied the offers. They are offering Rs 50-60 crore to a number of people. #MadhyaPradesh pic.twitter.com/rP2ZgCKp2I
— ANI (@ANI) May 27, 2019