नवी दिल्ली – कांद्याच्या देशांतर्गत भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने यंदा 50 हजार टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती अन्न मंत्रालयाच्या एका वरीष्ठ अधिाकाऱ्याने दिली. लासलगावच्या कांदा बाजारात कांद्याच्या भावात सध्या 29 टक्के इतकी वाढ झाली आहे. हे दर आता 11 रूपये किलो इतके आहेत. गेल्यावर्षी याच दिवशी हे दर 8 रूपये 50 पैसे इतके होते.
राजधानी दिल्लीत कांद्याचा किरकोळ विक्रीचा दर 20 ते 25 रूपये किलो इतका आहे. यंदा महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील पुरवठा कमी झाला की बफर स्टॉक मधील माल विक्रीला आणून पुरवठा सुरळीत ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मालाच्या भावावर नियंत्रण राहू शकते. या योजनेअंतर्गत सरकारेन आत्तापर्यंत नाफेड मार्फत 32 हजार टन कांदा खरेदी केली आहे.