वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मोठे नुकसान
पुणे – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या जीवितहानीसाठी वनविभागातर्फे 2018-19 या वर्षात सुमारे
13 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक नुकसान भरपाई ही पशुधनहानीसाठी देण्यात आली असून ती 8 कोटी 2 लाख 76 रुपये इतकी आहे, अशी माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे.
मानवी वस्तीत घुसलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत अथवा गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या नागरिकांना तसेच पशुधन नुकसानीसाठी भरपाई देण्यात येते.
याअंतर्गत मृत व्यक्तींसाठी 10 लाख रुपये, तर गंभीर स्वरूपातील जखमींसाठी दीड ते पाच लाख रुपयांची नुकसान्भरपाई देण्यात येते. तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या पशुधनहानीसाठी सुमारे 25 ते 40 हजार रुपयांची मदत दिली जाते. यामध्ये वाघ, बिबट, अस्वल, हत्ती, कोल्हा, मगर, रानकुत्री, गवा यांसारख्या वन्यप्राण्यांचा समावेश आहे.
या नियमांतर्गत वनविभागातर्फे 2018-19 या वर्षात जीवितहानीसाठी सुमारे पाच कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यामध्ये मनुष्यहानीच्या 35 नोंदी असून यासाठी तब्बल 3 कोटी 911 हजार रुपये देण्यात आले आहेत. तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या 4 नागरिकांना 6 लाख 54 हजार रुपये इतकी नुसान भरपाई देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गंभीर जखमींच्या 155 नोंदी, तर किरकोळ स्वरूपातील जखमींची संख्या 140 इतकी आहे. यांना अनुक्रमे 92 लाख 44 हजार आणि सोळा लाख 35 हजार इतकी नुकसान भरपाई दिल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे. तर पशुधन नुकसानीसाठी सुमारे 8 कोटी 2 लाख 76 रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे.