नवी दिल्ली – पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत (पीएमजीएसवाय) तीन वर्षात देशभरात 1 लाख 45 हजार 198 कि.मी.चे 27 हजार 337 रस्ते बांधण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रात 2 हजार 837 कि.मी.चे 489 रस्ते बांधण्यात आले आहेत.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत देशातील 29 राज्यांच्या ग्रामीण भागात 2016-17 , 2017-18 आणि 2018-19 या तीन वर्षांच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या रस्त्यांची माहिती केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत लिखीत उत्तरात दिली.
महाराष्ट्रात वर्ष 2016-17मध्ये 2 हजार कि.मी आणि 700 मिटरचे 199 रस्ते बांधण्यात आले. वर्ष 2017-18मध्ये 569 कि.मी आणि 758 मिटरचे 196 रस्ते बांधून झाले, तर 2018-19मध्ये 266 कि.मी आणि 828 मिटरच्या 94 रस्त्यांचे बांधकाम झाले.
देशातील 29 राज्यांमध्ये अनुक्रमे वर्ष 2016-17मध्ये 47 हजार 446 कि.मी.चे 8 हजार 410 रस्ते बांधण्यात आले. वर्ष 2017-18मध्ये 48 हजार 714 कि.मी.चे 9 हजार 695 रस्ते, तर 2018-19मध्ये 49 हजार 37 कि.मी. आणि 550 मिटरच्या 9 हजार 232 रस्त्यांचे बांधकाम झाले.