कराईकुडी – गोव्याची भक्ती कुलकर्णी व दिल्लीची वंतिका अग्रवाल यांनी महिलांच्या 46 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर संयुक्त आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रत्येकी 4.5 गुण झाले आहेत. या स्पर्धेतील पाचव्या फेरीत भक्ती व वंतिका यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. डावाच्या मध्यास भक्ती हिची बाजू बळकट झाली होती. मात्र वंतिकाने केलेल्या भक्कम बचावापुढे भक्तीला विजयाची संधी साधता आली नाही. त्यांनी 59 व्या चालीस बरोबरी मान्य केली.
या स्पर्धेतील अन्य लढतीत महाराष्ट्राच्या मृदुल देहणकरने पेट्रोलियम क्रीडा मंडळाची खेळाडू सौम्या स्वामीनाथन हिला बरोबरीत ठेवले. मृदुलने केलेल्या बचावात्मक खेळापुढे सौम्याला डावपेच साध्य करता आले नाही. अखेर हा डाव 42 व्या चालीस बरोबरीत राहिला.
सहा वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या एस.विजयालक्ष्मी हिला आरती रामस्वामीने बरोबरीत रोखले. चुरशीने झालेला हा डाव 73 व्या चालीस अनिर्णित राहिला. महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने व्ही. वर्शिनी (तामिळनाडू) हिच्यावर शानदार विजय मिळविला. तिचे चार गुण झाले आहेत. के.मनीषा मोहंती हिला तामिळनाडूच्या श्रिजा शेषाद्रीने पराभवाचा धक्का दिला. शेषाद्रीने आतपर्यंत चार गुणांची कमाई केली आहे.