रोहयोअंतर्गत 385 कामे सुरू; दुष्काळ निवारणासाठी सरकारचे एक पाऊल पुढे
प्रशांत जाधव
सातारा – राज्यासह सातारा जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थीतीने शेतकरी होरपळुन निघत आहे. अशा परिस्थीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे दुष्काळाची झळ बसू नये यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने जिल्ह्यात रोहयोअंतर्गत सुमारे 385 कामे सुरू केली आहेत. तर बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी 1.78 कोटींचा निधी दिला आहे. जिल्ह्यातील दुष्काळ निवारण करताना सरकारला पुर्णपणे यश आले नसले तरी त्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील अकरा पैकी माण-दहिवडी, कोरेगाव, फलटण या तीन तालुक्यामध्ये सरकारकडून दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमधील 183 गावे व 770 वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण 219 टॅंकर सुरु करण्यात आले आहेत. सर्वाधिक माण तालुक्यात 107 तर सर्वात कमी सातारा तालुक्यात एक टॅंकर सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात 385 कामे सुरु असून त्यावर 2 हजार 398 मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यामध्ये 15 हजार 379 कामे शेल्फवर आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात आजअखेर 34 विंधन विहिरी, सात नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करुन तसेच 4 तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन 111 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. थकित विद्युत देयकामुळे बंद पडलेल्या दुष्काळी तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी सरकारकडून 1 कोटी 78 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून या योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. सध्या सातारा जिल्ह्यात 20 शासकीय चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मोठी जनावरे 16 हजार 984 तर लहान जनावरे 3 हजार 165 अशी एकूण 20 हजार 149 जनावरे दाखल आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 3 तालुक्यातील 310 गावातील 1 लाख 35 हजार 732 शेतकऱ्यांना 41.93 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण 47 हजार 167 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी 2.42 कोटी इतकी रक्कम 6 हजार 278 पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 3.48 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 55हजार शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण 11 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे.