“आरटीई’ प्रवेशासाठी आता दि.24 जुलैपर्यंत मुदतवाढ
75 हजार 448 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीअखेर 41 हजार जागांवरील प्रवेश अद्याप रिक्तच राहिले आहेत. प्रवेशासाठी दि.24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांत “आरटीई’अंतर्गत 9 हजार 145 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 808 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 2 लाख 45 हजार 487 ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रवेशासाठी दि.10 जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली होती. यातील प्रवेशासाठी 18 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र काही शहरी व ग्रामीण भागातील पालकांनी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अद्यापही जे पालक शाळांमध्ये प्रवेशासाठी गेले नाहीत किंवा ज्या पालकांना प्रवेशाची लॉटरी लागल्याचे कळलेच नाही त्यांना “एसएमएस’ करुन शाळेत प्रवेश घेण्याविषयी कळवावे. दि.25 व 26 जुलै रोजी प्रवेशाच्या रिक्त जागांचा आढावा घ्यावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी शैलजा दराडे यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, महापालिका व नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी, बृहन्मुंबईचे शिक्षणाधिकारी यांना बजाविल्या आहेत. उर्वरित सर्व रिक्त जागांसाठी प्रवेशाची विशेष फेरीही घेण्यात येणार आहे.
तिसऱ्या फेरीअखेर प्रवेशासाठी 1 लाख 24 हजार 414 विद्यार्थ्यांना प्रवेशाची लॉटरी लागली. यातील 75 हजार 448 विद्यार्थ्यांचा शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. आणखी बऱ्याचशा जागा शिल्लक राहिल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे सोयीची शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणीच करुन घेतलेली नाही. शाळांमध्ये प्रवेशासाठी पालक पाठ फिरवू लागले आहेत.