नवी दिल्ली – कर्नाटकात यंदा 45 टक्के कमी पाऊस झाला असून राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 2064 कोटी रूपयांची तातडीची मदत द्यावी अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून केली आहे. अनेक केंद्रीय योजनांचा निधी अद्याप केंद्र सरकारने कर्नाटकाला दिलेला नाही विशेषत मनरेगा योजनेचा निधी केंद्राकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबीत आहे. हा आकडा सुमारे पंधराशे कोटी रूपये इतका आहे. तो निधी त्वरीत द्यावा अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली.
राज्यात भीषण दुष्काळी स्थिती असून त्यातून कर्नाटकातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्राने तातडीने मदत दिली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी मोदींकडे व्यक्त केली. ते म्हणाले की कर्नाटकातील 30 जिल्ह्यातील 156 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून त्यातील 107 तालुक्यातील दुष्काळी स्थिती अत्यंत चिंताजनक आहे असे त्यांनी म्हटले आहे.