अर्थमंत्रालयाचे माजी सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा दावा
नवी दिल्ली – 2011-12 ते 2016-17 या कालखंडात भारताचा विकासदर सात टक्के असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र राष्ट्रीय उत्पन्नाचे मूल्यांकन सदोष पद्धतीने केले असल्यामुळे विकासदर सात टक्के असल्याचे भासत होते. प्रत्यक्षात हा विकासदर 2.50 टक्क्यांनी जास्त दाखविण्यात आला असल्याचा दावा अर्थ मंत्रालयाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केला आहे.
संशोधन अहवालात सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे की, 2011-12 नंतर पुढे ज्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले गेले आहे ते चुकीचे आहे. प्रत्यक्षात विकासदर 4.5 टक्के असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नव्या पद्धतीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता गरजेपेक्षा जास्त दाखविण्यात आलेली आहे. आता स्थूल अर्थव्यवस्था फारशी बळकट नाही. त्यामुळे केंद्र सरकारला आक्रमकपणे आर्थिक सुधारणा राबविता येणार नाहीत. यासाठी आगामी काळात खऱ्या अर्थाने विकासदर वाढावा याकरिता नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सुब्रमण्यम यांनी अभ्यास अहवालात सांगितले.
गेल्याच महिन्यात केंद्रीय सांख्यिकी विभागाने चौथ्या तिमाहीतील विकासदर केवळ 5.8 टक्के असल्याचे म्हटले होते. हा विकासदर चीनच्या विकासदरापेक्षा कमी आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचे वेळोवेळी सरकारने म्हटले आहे.
त्याचबरोबर गेल्या आठवड्यात भारतातील बेरोजगारीचा दर प्रचंड असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आता सुब्रह्मण्यम यांनी मुळात विकासदर जास्त भासविण्यात आला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या संशोधन अहवालात यासाठी बरेच पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे या विषयावर आगामी काळात बरीच उलटसुलट चर्चा होण्याची शक्यता आहे.