पुणे – जिल्ह्यातील चाराटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्यामुळे राज्य शासनाकडून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 16 चारा छावण्या सुरू झाल्या असून, छावण्यांमध्ये 7 हजारांपेक्षा अधिक जनावरे दाखल झाली आहेत.
जिल्ह्यात शिरूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 6 छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये दूर पाबळ, कान्हूर मेसाई केंदूर पारंपरिक दुष्काळी भाग आहे. मात्र, नदीचे समृद्ध बेट अशी ओळख असणाऱ्या हाजी टाकळी आणि निमगाव दुडे तसेच नावरे येथे 3 चारा छावण्या बागायती पट्ट्यात सुरू झाल्याने त्याकडे लक्ष वेधले आहे. बारामतीमध्ये सुपे, उंडवडी, पळशी आणि सोमेश्वर या चार ठिकाणी तर इंदापूरमध्ये निरवंगी, इंदापूर आणि निमगाव केतकी या 3 ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. जुन्नर तालुक्यात शिंदेवाडी आणि दौंडमध्ये पाटस आणि पुरंदरमध्ये परिंचे येथे प्रत्येकी 1 छावणी सुरू आहे. दरम्यान, आणखीन 3 ठिकाणी छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या सर्व 4 छावण्यांना राज्य सरकारच्या अनुदानातून मोठ्या जनावरांसाठी 100 रुपये तर छोट्या जनावरांसाठी 50 रुपये अनुदान संबंधित चारा छावणी चालक संस्थांना दिले जाते. याशिवाय 3 ठिकाणी खासगी व्यक्ती संस्थांनी छावण्या सुरू केल्या आहेत. सर्वाधिक दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या पुरंदरमध्ये यावेळी फक्त एक चारा छावणी आहे. तर बागायती भागात छावण्यांची संख्या वाढत असून आजूबाजूला परिसरात ऊस आणि दुसऱ्या बाजूला चारा छावण्या असे चित्र बघायला मिळत आहे.
शासकीय छावणीचा फलक गायब
काही चारा छावण्यांमध्ये जनावरे दाखल करून घेण्यास काही विशिष्ट शेतकऱ्यांना नकार दिला जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शासकीय चारा छावणी असूनही त्याठिकाणी फलक लावला जात नाही. जनावरांना प्रतिदिन किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारचे खाद्य, पशुखाद्य द्यावे याचे फलकदेखील छावण्यांवर नाहीत. गेल्या आठवडाभरात येथील छावण्यांमध्ये पशुखाद्य मिळाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची केली आहे.
अधिकाऱ्यांमध्ये चिंता
दुष्काळी भाग असणाऱ्या गावांपेक्षा सधन आणि बागायती क्षेत्रात चारा छावण्या वाढत आहेत असे का? या प्रश्नावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.