महेंद्र हसबनीस यांचा आरोप : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
पुणे – तळेगाव येथील एका रबरनिर्मिती करणाऱ्या कंपनीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे तब्बल 14 जनावरे दगावली असल्याचा आरोप तळेगाव येथील रहिवासी महेंद्र हसबनीस यांनी केला आहे. औद्योगिक प्रदूषणाचा प्रकार असूनही राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ याप्रकरणाची दखल घेत नसल्याची खंत हसबनीस यांनी व्यक्त केली आहे.
तळेगाव येथील सिक ऑटो या कंपनीतून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असून त्याचा मानवी तसेच प्राण्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. जनावरांच्या चाऱ्यावर साचत असलेल्या या कार्बनच्या अतिसेवनामुळे परिसरातील 14 जनावरे दगावली आहेत. इतकेच नव्हे तर नुकतेच एका गायीचा देखील मृत्यू याच कारणामुळे झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले असल्याचे हसबनीस यांनी सांगितले.
याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली असता मंडळाने कंपनीकडून उत्सर्जनाचे नमूने गोळा करण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही या अहवालाबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. तर दुसरीकडे कंपनीचे अधिकारी “किरकोळ रक्कम घेऊन हा विषय संपवा’ अशा प्रकारचे भाष्य करत आहेत. मात्र, मूळ प्रश्नाकडे कोनीही गांभीर्याने पाहत नसून कार्बन उत्सर्जनाची समस्या अधिकच बिकट होत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही याचे वाईट परिणाम उद्भवतील अशी भीतीदेखील हसबनीस यांनी व्यक्त केली आहे.
अहवाल आल्यानंतर कार्यवाही करू
याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधला असता, कार्बन उत्सर्जन हे आरोग्यास हानीकारक असले, तरी त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता वाटत नाही. तरीही कंपनीतून तपासणीसाठी नमूने गोळा करण्यात आले असून त्याबाबतच्या अहवालाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. त्यनंतरच याबाबत पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी सांगितले.