बाराबंकी -उत्तरप्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात विषारी दारूने 12 जणांचा बळी घेतला. सोमवारी रात्री एका दुकानातून विकत घेतलेली दारू प्यायल्यानंतर 40 हून अधिक जणांना त्रास होऊ लागला. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्या दुर्घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.
दुर्घटनेमागे राजकीय कारस्थान आहे का, याची चाचपणीही चौकशीदरम्यान केली जाणार आहे. दुर्घटनेनंतर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाच्या 10 तसेच 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, उत्तरप्रदेश सरकारने मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली.