आगरकर मळ्यात पाणीच पाणी
नगर: एकेकडी पाण्यासाठी ग्रामीण भाग तहालेला असतांना दुसरीकडे महापालिकेच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणी वाया जात असतांना पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील आगरकरमळा परिसरातील महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेवरील पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने तब्बल 10 लाखा लिटर पाणी वाया गेले. याला कोण जबाबदार आहे. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नगर शहरात व्हॉल्व खराब होण्याच्या घटना वारंवार शहरात घडत आहेत. महापालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. शहरातील आगरकरमळा परिसरातील महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेवरील पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लीटर पाणी रस्त्यावर वाहिले. याबाबत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्याकडे संपर्क साधल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी दुरुस्त केली. परंतू तोपर्यंत पाणी वाया गेले होते. 10 लाख लिटर क्षमता असलेल्या टाकीतून संपूर्ण पाणी रस्त्यावर सोडावे लागले. पाणीपुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे यांनी घटनास्थळी जावून दुरूस्तीसाठी हालचाली सुरु केली. यावेळी अनेकांनी अतिरिक्त पाणी भरुन घेतले. तर काहींनी चक्क गाड्या धुवून घेतल्या. तांत्रिक बिघाडामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मुळा धरणातील पाण्याने तळ गाठला असताना व्हॉल नादुरुस्तीमुळे आगरकर मळ्यात सकाळी आठ वाजता पाणी रस्त्यावर वाहत होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील पाईपलाईन, नादुरुस्त व्हॉल दुरुस्त करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. परंतू कोणाचा अंकुश नसलेल्या महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानीच कारभार सुरू आहे. त्याचा फटका नगरकरांना बसत आहे. महापालिका आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेवून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी करण्यात आली आहे.
तसेच पाच दिवसांपूर्वी शहराच्या सर्जेपुरा भागात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयालगत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून पाणीगळती सुरू झाली होती. या पाईपलाईनवरचा व्हॉल्व काहींनी जाणीवपूर्वक बिघडवल्याने ही पाणीगळती होत असल्याचे बोलले जात होते.
आगरकर मळा येथे ही व्हॉल्व बिघाडल्याने ही पाण्याची गळती झाली. दुष्काळी परिस्थितीत शहरात पाईपलाईनमधून अशी पाणीगळती होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सध्या जिल्ह्यात आजमितीला 774 टॅंकरने दुष्काळी भागात पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा असे अनेक वेळा प्रशासनाकडून सांगण्यात येत. परंतू शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. परंतू शहरात अनेक ठिकाणी मोठ्या संख्येत व्हॉल्व खराब असून त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. हे पाणी गळती थांबली पाहिजे, असे ही नागरिकांमधून बोलले जात असून संबंधित प्रशासनाने याकडे गांभिर्यांने लक्ष दिले पाहिजे.