कोपरगाव: येथील पाणी बचाव समिती व लोकसहभागातून येसगाव येथील नगरपालिकेच्या साठवण क्रमाक तीन मधील एक हजार 300 ट्रॅक्टरपेक्षा जास्त गाळ बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.
दरम्यान, आमदार स्नेहलता कोल्हे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या विशेष प्रयत्नामुळे गंगापूर, दारणा धरण समूहातून सोमवारी गोदावरी नदीमार्गे नांदूर मध्यमेश्वर धरणापर्यंत कोपरगाव, शिर्डी, वैजापूरसाठी सुमारे 2 हजार 100 दशलक्ष घनफूट पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. पुढील दोन आठवडे हे आवर्तन चालणार आहे. नांदूर मध्यमेश्वर धरण बंधारा भरल्या नंतर डावा व उजव्या कालव्यात सोडले जाणार आहे. हे पाणी कोपरगावपर्यंत येण्यास किमान चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.
गेल्या सहा दिवसांपासून पाणी साठवण तलावातून 15 ट्रॅक्टर, दोन जेसीबी, तीन केणी, एक पोकलेनद्वारे आतापर्यंत एक हजार 300 ट्रॅक्टरपेक्षा जास्त गाळ काढण्यात आला. उर्वरित दोन दिवसांत अजून 1000 ट्रॅक्टर गाळ काढण्याचे नियोजन आहे. ट्रॅक्टर, जेसीबी गाळामध्ये फसणे, तसेच रोजचा यंत्रसामग्रीवरील 60 हजार रुपये खर्च इ. अडचणींवर मात करून आत्तापर्यंत 75 टक्के गाळ काढण्यात समितीला यश आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात पाणीबाणी निर्माण झाली असून, महिन्यातून दोन वेळा पाणी दिले जात आहे. चार पैकी तीन साठवण तलाव पूर्ण कोरडे ठाक पडले आहेत. मात्र पाणी प्रश्नावरून सोशल मीडियावर राजकारण होऊन त्याची चर्चा घडत आहे. नगरपालिकेने पत्र दिल्याने गाळ काढण्यात आम्ही पुढाकार घेतला असल्याचे काका कोयटे व आदिनाथ ढाकणे यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसांत या तलावाचे फिनिशिंग करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.