परिसर होतोय प्लॅस्टिकमुक्त ः निसर्गप्रेमींचे सलग चौथे वर्ष
जुन्नर- सरकारच्या वतीने दरवर्षी वृक्ष लागवडीबाबत कोट्यवधींचे आकडे जाहीर केले जातात; परंतु पुढे ती जगतात की नाही, याबाबत आकडेवारी मिळत नाही; परंतु जर पावसाच्या तोंडावर आणि डोंगर रांगांवर जर बीजरोपण झाले तर ही झाडे नैसर्गिकरीत्या वाढतात. हे बीजरोपणाचे काम विविध भागांतून फेसबुकच्या माध्यमातून एकत्र येणारे युवक दरवर्षी करत असल्याची माहिती वनरक्षक आणि माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी दिली.
रविवारी (दि. 10) नगर, कल्याण, सातारा, लातुर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतूनन आलेल्या 60 पर्यटकांनी 12 विविध वृक्ष प्रजातींच्या जवळपास 5 किलो बियांचे रोपण नाणेघाट आणि किल्ले जीवधन परिसरात केले. अंदाजे 3 हेक्टर क्षेत्रात बीजरोपण केल्यानंतर दोन तासांनी याठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वांना आनंद झाला आणि बीजरोपण योग्य वेळेस झाल्याची खात्री झाली.