- शेतकऱ्यांमध्ये अधिक प्रमाण ः अंधश्रद्धा दूर करून काळजी घेणे आवश्यक
– रामदास सांगळे
अणे – पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाच प्रमाण वाढत चालेल आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने सापाच्या बिळामध्ये पाणी जाऊन साप बाहेर येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. एप्रिल 2018 ते जून 2019 पर्यंत जुन्नर तालुक्यात 190 जणांना सर्पदंश झाला आहे. खासगी आणि शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. संपूर्ण भारत वर्षाचा विचार करता सर्वाधिक सर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. सापांविषयी असलेले लोकांचे अज्ञान, पुरेशी घेतली न जाणारी काळजी, अंधश्रद्धा ही त्यातील प्रमुख काही कारणे आहेत.
मक्याच्या कणसांमध्ये किंवा वळईमध्ये उंदीर जास्त प्रमाणात असतात आणि उंदीर हे सापाचे खाद्य असल्यामुळे अशा ठिकाणी सर्पाचा वावर अधिक असतो, त्यामुळे या शेतांमध्ये सर्पदंशाच्या घटना जास्त घडतात. यात सर्वाधिक सर्पदंश हे पायाला झालेले दिसतात. म्हणूनच गवताळ प्रदेशामध्ये पायांच्या घोट्यापर्यंत बूट वापरले तर सर्पदंशाच्या घटनांना आळा बसेल. वळईमध्ये हात घालताना हूकचाच वापर करावा.
साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सापांबद्दल जनमानसात भीतीची भावना असते, कारण म्हणजे त्यांचे विष. खरे तर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशी वर्गवारी होते. सापांच्या डोक्याच्या कवटीमध्ये सांध्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या जबड्यापेक्षा जास्त मोठ्या भक्ष्य देखील गिळू शकतात. या सर्पाबद्दलच्या अनेक कारणांमुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण असते, त्यातही पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.