309 झाडांवर कुऱ्हाड : रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पर्यावरणाची पायमल्ली
शिरूर/ न्हावरे – शिरूर तालुक्यातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील 309 झाडांच्या कत्तली झाल्या आहेत. त्यामुळे वृक्षतोडीचा “दांडा’ गोतास काळ ठरत आहे. शिरूर तालुक्यात हजारो झाडांच्या कत्तली झाल्या आहेत. प्रशासन झाडे लावण्यापेक्षा वृक्षतोड करण्यात धन्यता मानत आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव, करडे, आंबळे, न्हावरे, इनामगाव, तांदळी रस्त्यावरील 309 झाडांच्या कत्तली आता रुंदीकरणाच्या नावाखाली झाल्या मआहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील झाडांच्या कत्तली थांबायचे नाव घेत नाही. झाडे तोडण्याकरिता शिरूर तालुक्यात वन विभागाची परवानगी घेतली जाते. ही परवानगी देताना सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्याकडून शंभर रुपयांचे बंधपत्र करून घेतले जाते. यामध्ये एक झाड तोडल्याबद्दल दुप्पट झाडे लावण्याचे बंधपत्रामध्ये लिहून घेतले जाते. परंतु आत्तापर्यंत बंधपत्रात लिहून दिलेल्या नियमावलीना बांधकाम विभागातील ठेकेदारांनी वाटाण्याच्या अक्षता लावून कचऱ्याची टोपली दाखवत आहे.
शिरूर तालुक्यातून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथे जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु रस्त्याच्या दुतर्फा अनेक वर्षांपासून अस्तित्वात असणारे वड, चिंच, सुबाभूळाची शेकडो झाडे आहेत.
सार्वजनिक विभागाच्या वतीने रस्ता रुंदीकरणासाठी 309 झाडे तोडण्याची परवानगी घेऊन झाडांच्या कत्तली सुरू आहेत. त्यामुळे हा रस्ता भकास दिसत आहे. यापूर्वी शिरूर तालुक्यात महत्वाच्या मार्गावर झाडे तोडण्यात आल्यानंतर पुन्हा वृक्षारोपण करण्यात आले नाही. औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात जळण म्हणून लाकूड वापरले जात आहे. त्यामुळे शिरूर तालुका भविष्यात ओसाड होण्याची भीती व्यक्त होत आहे. वृक्षतोडीवर कुऱ्हाड चालविणाऱ्या वखारवाल्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शिरूर तालुक्यातील सर्व वखारी बंद झाल्या पाहिजेत. संपूर्ण तालुक्यात वृक्षतोड बंदी करावी. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कुऱ्हाडबंदीचा ठराव आपापल्या ग्रामसभेत केला पाहिजे तरच पुढचा येणार काळ आपल्याला सुसह्य होईल; अन्यथा भवितव्य भयंकरच असणार आहे. याबाबत दुमत नाही.
– अमोल घायतडक, सामजिक कार्यकर्ते, करडे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, वैद्यकीय विभाग बारामती यांनी रस्त्याच्या रुंदीकरण करण्यासाठी 309 झाडांची तोड करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्याबदल्यात दुप्पट झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे बंधपत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून घेतले आहे.
– एस. एल. गायकवाड, वनपाल, वनविभाग शिरूर.
कत्तलीचे सत्र थांबता थांबेना
शिरूर तालुक्यात सर्वात जास्त वृक्षतोड झाली आहे. शिरूर- पुणे रस्त्यावरील चौपदरीकरण करण्यासाठी हजारो झाडे तोडली आहेत. शिरूर शहरात रस्ता रुंदीकरण कामाच्या वेळेस शेकडो झाडे तोडली आहेत. शिरूर चासकमान वसाहतीत साडेतीनशेवर झाडे तोडली आहेत. झाडांच्या बदल्यात दुप्पट झाडे लावण्याचे बंधपत्र शिरूर वन विभागाने घेतले होते. मग यातील किती झाडे लावली गेली आहेत. याची आकडेवारी वनविभागाकडे नाही. जेवढी झाडे तोडली आहेत. तितकी झाडे बांधकाम विभाग व ठेकेदारांनी लावली नाही. त्याच्यावर अद्याप वनविभागाने कार्यवाही का केली नाही, असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींतून उमटत आहे.