राजगुरूनगर -शिक्षण हे वाघिणीचे दूध राहिले नसून ते नागिणीचे दूध झाले आहे. जर वाघिणीचे दूध असते तर समाजात छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा विचारांची माणसे जन्माला आली असती. त्यांच्या विचारांचे राज्यकर्ते तयार झाले असते. मात्र, असे न झाल्याने शिक्षण वाघिणीचे नव्हे नागिणीचे दुधच बनले आहे, असे विचार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून राजगुरूनगर येथील पंचायत समितीच्या इमारतीवर स्वराज्याची भगवी गुढी उभारण्यात आली, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गारगोटे बोलत होते. यावेळी खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, पंचायत समितीचे सदस्य अंकुश राक्षे, सदस्या वैशाली जाधव, सुनिता सांडभोर, सामाजिक कार्यकर्ते वामन बाजारे, उद्योजक गणेश जाधव, संतोष सांडभोर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बी. एस. शिंदे, विस्तार अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ, गणेश काळे, रमेश आंबेकर, ग्रामसेवक संतोष ढोरे, गणेश रोकडे, सुहास शिंदे, आर. एस. भोगावडे, अजय मुद्रांकित, शशांक वेदपाठक, महेश शिंदे, कुंदा थोरात, मंगेश शिंदे, प्रवीण नाईकरे, कविता पाटील, सुरेखा तरडे, डॉ. माने, सुवर्णा मडके, आर. डी. जांभळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून झाली, त्यानंतर सामुहिक आरती घेण्यात आली. पंचायत समितीच्या इमारतीवर स्वराज्याची गुढी मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात आली. संपत गारगोटे म्हणाले की, देशात शांतता राहण्यसाठी आणि अराजकता कमी करण्यासाठी पुरोगामी विचार समाजाने आत्मसात करण्याची गरज आहे.