महापालिकेचा उपक्रम : खत निर्मितीसाठी होणार राखेचा उपयोग
पुणे – शहरातील सर्वांत मोठ्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांकडून मृत व्यक्तीचे कपडे, त्याचे साहित्य तसेच राख स्माशनभूमीच्या मागील बाजूस असलेल्या आंबील ओढ्यात टाकली जाते. त्यामुळे नदीप्रदूषण होत असल्याने हे साहित्य संकलन करण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. येथे दोन स्वतंत्र कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यात जमा होणाऱ्या राखेचा वापर खत निर्मितीसाठी होणार आहे. जमा होणारे कपडेही स्वयंसेवी संस्थाना दिले जाणार आहेत.
घरातील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे चोवीस तास या स्मशानभूमीत गर्दी असते. अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांकडून अनेकदा मृत व्यक्तीचे कपडे, त्याचे साहित्य, स्मशानभूमीत आणले जाते. अंत्यविधीनंतर हे साहित्य हे नातेवाईक मागील बाजूस असलेल्या नाल्याच्या ठिकाणी टाकून देतात. त्यानंतर “राख सावडणे’ विधीसाठी आलेले नातेवाईकही दशक्रिया विधीनंतर अनेकदा राख नदीत विसर्जित करतात. मात्र, यामुळे नदी प्रदूषण वाढत आहे. त्याकडे कोणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तर नातेवाईकांच्या भावनाही दुखावल्या जातात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने ही राख तसेच मृतांची कपडे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र कंटेनर ठेवलेले असून महापालिकेचे कर्मचारीही नातेवाईकांना कपडे आणि राख या ठिकाणी टाकण्यासाठी विनंती करतात. त्यामुळे नागरिकांचाही त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. या उपक्रमाची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी रविवारी वैक़ुंठ स्मशानभूमीस भेट देऊन घेतली.
वैकुंठ स्मशानभूमीतील राख तसेच मृतांचे कपडे तसेच इतर साहित्य नदी तसेच आंबील ओढ्यात टाकले जातात. या दोन्ही ठिकाणी दुर्गंधी, प्रदूषण आणि घाणही आहे. त्यामुळे कपडे आणि राख स्वतंत्र कंटेनरमध्ये देण्याची विनंती आम्ही करत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आयुक्तांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
– ज्ञानेश्वर मोळक, विभाग प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन