सातगाव पठारावरील खड्ड्यात वाळून गेली झाडे
पेठ- राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. सातगाव पठारावर ही अनेक ठिकाणी झाडे लावण्यात आली. पेठ कुंरुवडी रोडच्या कडेने ही अनेक झाडे लावण्यात आली होती. पण झाडे जगण्याचे प्रमाण फारच कमी आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक सेलिब्रेटी झाडे लावताना आपण फोटोमध्ये पाहतो, पण पुढे त्या झाडाचे काय होते, हे कोणी ही पाहत नाही. झाड जळून जात असून खड्डा तसाच राहत असल्याचे चित्र दिसत आहे. यातून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
वृक्ष लागवड करण्यामागे पाणी टंचाई हे एक प्रमुख कारण आहे. पाण्याची भूजल पातळी वाढविण्याबरोबर वैश्विक तापमानवाढ, पर्यावरणाचा समतोल राखणे, ग्रामीण भागांना हरित करणे, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची लाकूडफाटा, इंधन, फळांची, औषधी वनस्पती व जनावरांच्या चाऱ्याची गरज भागविणे हा हेतु आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेला रोजगार देण्यासाठी रोपवाटिका तयार करून वृक्ष लागवड, संगोपन करणे तसेच संरक्षण करण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. राज्यात 20 टक्के क्षेत्र हे वनीकरणाने व्यापले आहे.
पर्यावरणाच्या विकासाच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व लक्षात घेता 2017 ते 2019 पर्यंत राज्य सरकारने सुमारे 50 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. 2019 या वर्षांत सुमारे 13 कोटी झाडे लावण्याचे निश्चित केले आहे. वृक्ष लागवड करताना सरकारी व वन जमिनी या ठिकाणीच झाडे लावण्याशिवाय खासगी पड जमिनी तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर झाडे लावण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यानंतरच वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, साग, चंदन, बांबू, आवळा, हिरडा, अर्जुन, सिताफळ, चिंच, जांभूळ, खैर, आंबा यासारखी 22 प्रकारची झाडे लावली जात आहेत.
- झाडांचे संगोपण करण्याची गरज
झाडे लावण्याचे उद्दिष्ट किती ही चांगले असले तरी जगविणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. कोट्यवधी झाडे लावण्यापेक्षा थोडी कमी झाडे लावून ती जगवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी पर्यावरणवादी कररत आहेत.