उरुळी कांचन – उरुळी कांचन ते लोणी काळभोर टोल नाक्यापर्यंत मोठ्या संख्येने मंगल कार्यालय आहेत. हवेली तालुक्यात राजकीय पुढाऱ्यांची रेलचेल आहे. त्यात नागरिकीकरणामुळे गुंठामंत्र्यांची मांदियाळी झालेली आहे. त्यामुळे बडा डामडौल करताना विवाह सोहळे थाटामाटात करण्याचा ट्रेंड हवेली तालुक्यात रुजला आहे. त्यातून मंगल कार्यालयाला पाश्चात्यीकरणाचा फील आणला जात आहे. चार दिवसांपूर्वी सोहळ्यात नाव पुकारले नाही, म्हणून हाणामारीची घटना घडली आहे.
हवेली तालुक्यातील उरूळी कांचन, वाघोली, लोणी काळभोर ही शहरालगत आहेत. नागरिकीकरणामुळे ही गावे कवेत घेतली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जमिनी कवडीमोल भावाने बांधकाम व्यावसायिकांना विकल्या आहेत. 20 वर्षांपूर्वी विकलेल्या जमिनीतून बांधकाम व्यावसायिकांनी शंभर नंबरी सोने काढले आहे. हवेली तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यात काहीजण राजकीय छावणीत दाखल झाले आहेत. त्यातून राजकीय पदांची रेलचेल जोरात आहे. तरूणांनी जमिनी विकून पैसे उपलब्ध केला आहे. त्यातून प्रत्येक कार्यकर्त्यांकडे चारचाकी वाहने आहेत. 4 ते 6 तोळ्याची गोफ घालून 4 ते 7 मित्रांना घेऊन अचानक सोहळ्यात हजेरी लावतात. त्यामुळे लग्नकार्यात क्षुल्लक कारणावरून भांडणे होऊ लागली आहेत. सोहळ्यात वधू-वरांकडील स्वागत करण्यासाठी प्रत्येकी एक-एक माणूस उभा राहतो. मात्र, ठराविक व्यक्तीचे नाव घेतल्यामुळे कार्यालयात सनईचे सूर ऐकण्याऐवजी कलहाचे सूर ऐकायला मिळत आहेत. त्यात हा मुद्दा आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मंगलसमयी मानपान, राजकीय, श्रेयवादाचे विदारक दर्शन दिसत आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले म्हणाले की, सूत्रसंचालन करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. सोहळ्यातील मान्यवरांचे आवर्जून उल्लेख करावा. अन्यथा सूत्रसंचालन करू नये.
लग्नसोहळा सकाळपासून व्यवस्थित होतो. मात्र, अलिकडील काळात माझे स्वागत करण्यात नाव घेतले नाही. म्हणून वादविवाद होतात. आता तर भांडणे व हाणामाऱ्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जो कोणी भांडणे करेल, त्याची गय केली जाणार नाही. भांडणे कशावरून झाली आहेत, हे पाहून गुन्हा दाखल केला जाईल. यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही.
– सूरज बंडगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर
मानपान हे भांडणाचे मूळ
हवेली तालुक्यात लग्न सोहळे सुरू असल्याने राजकीय पदाधिकारी, नेते हजेरी लावतात. नाव न घेण्यावरून हाणामारीचा ट्रेलर पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात अनूचित घटना घडू शकते. सोहळ्यात अनेकजण हजेरी लावत असल्याने सूत्रसंचालन करणाऱ्याची दमछाक होत आहे. त्यामुळे कोणते नाव घ्यावे, हे त्यांच्या लक्षात राहत नाही. काही सूत्रसंचालन करणारे जाणीवपूर्वक नाव घेत नाहीत, असा आरोप होत आहे. त्यामुळे मानपान हे भांडणाचे मूळ ठरले आहे.