डॉ. ओंकार पाटील : कर्मवीर स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर
सातारा, दि. 11 (प्रतिनिधी)- जन्मतः कोणीही हुशार नसतो. हुशार व यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक कष्ट घेतलेच पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयात अभ्यास करून क्षमता वाढवली तर कोणत्याही क्षेत्रात संधी सहज प्राप्त होते, असे मत डॉ. ओंकार पाटील (डायरेक्टर धन्वन्तरी मेडिसिन्स) यांनी केले.
व्हेक्टर ऍकॅडेमी, दै. प्रभात आणि इंगळे उद्योग समूह यांच्यावतीने कर्मवीर स्कॉलरशीप परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेचा निकाल दि. 7 रोजी सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात जाहीर करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण भागातील मुलांना अमित नौबदे (सिनिअर सॅप कन्सल्टन्ट, आयबीएम पुणे), डॉ. ओंकार पाटील (एमडी मेडिसीन, डायरेक्टर धन्वन्तरी मेडिसिन्स), प्रा. संग्राम भोसले (एमटेक आयआयटी दिल्ली, डायरेक्टर व्हेक्टर अकॅडमी), प्रा. अभिनंदन पिसे (एमटेक, उजएझ पुणे, को-डायरेक्टर व्हेक्टर अकॅडमी) यांनी करिअर मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुढील शैक्षणिक मागदर्शन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
डॉ. ओंकार पाटील म्हणाले, दहावीनंतर पुढे ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यादृष्टीने आत्तापासूनच नीट स्वरूपाच्या पात्रता परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू करणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रात करिअर करण्याची आवड आहे व तशी स्वप्ने पाहिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्षमता वाढवायला हवी. पालकांनीही मुलांमध्ये स्वत:ची स्वप्ने पाहताना काळजी घेतली पाहिजे.
अमित नौबदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात झोकून देवून कष्ट व अभ्यास केला तर त्या क्षेत्रात चांगल्या पध्दतीने करिअर करता येते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर करण्याची संधी आहे. युपीएसएसी व एमपीएससी तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून केंद्र, राज्य व निमशासकीय संस्थांमध्ये संधी मिळते. या परीक्षांसाठी देश व राज्यातून लाखो विद्यार्थी सहभागी होतात. त्यामुळे तीव्र स्पर्धेचा विचार करून परीक्षांसोबत प्लॅन बी तयार ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. संग्राम भोसले म्हणाले, सध्या बेरोजगार इंजिनिअरची संख्या वाढत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दर्जेदार संस्थांमधून शिक्षण घेतलेले इंजिनिअर कोठेही बेरोजगार असल्याचे दिसून येत नाही. आयआयटी संस्थांना सकारकडून अनुदान दिले जात असून या संस्थांचा परिरसर व शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. तसेच संस्थांचा अभ्यासक्रम देखील वेगळा आहे आणि विद्यार्थ्यांना एखाद्या प्रोजेक्टसाठी काम करायचे असेल तर संस्थेकडून आवश्यक ती सर्व मदत संस्थांकडून केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच आयआयटी हे उदिष्ट समोर ठेवून जेईई या पात्रता परीक्षेची तयारी सुरू करावी.
प्रा. अभिनंदन पिसे यांनी कर्मवीर स्कॉलरशिप या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत असताना, विद्यार्थ्यांनी स्वतःचे वेगळेपण जपत, स्वतःला घडवण्यासाठी सोशल मीडिया चा कशाप्रकारे वापर करून घेतला पाहिजे यावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा प्रीतम जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अभिजीत चव्हाण (एमटेक, तगढख मुंबई, को-डायरेक्टर व्हेक्टर अकॅडमी) यांनी आभार मानले.
25 शाळांतील विद्यार्थी सहभागी
सातारा शहर व परिसरातील 25 शाळांमधून घेतलेल्या कर्मवीर स्कॉलरशिप परीक्षेचा उपक्रम व्हेक्टर ऍकॅडमी, दै. प्रभात आणि इंगळे उद्योग समूह यांच्यावतीने सुरु करण्यात आला. उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी स्कॉलरशिप देण्यात आली. या परीक्षेसाठी जवळ जवळ 2500 विद्यार्थी बसले होते.