शितोळे सरकार यांचे आवाहनः माउलींच्या अश्वांचे 14 ला अंकलीहून प्रस्थान
पुणे – वारीतील अश्व प्राणी आहेत, अनेक वेळा गर्दीला पाहून ते बिचकतात, यावेळी काही अनुचित प्रकार घडू शकतात, असे काही होऊ नये याबाबत आपणच काळजी घ्यायला हवी आहे, त्यामुळे वारी काळात अश्वांच्या दिशेने हार, फुले किंवा तत्सम वस्तू फेकू नयेत, असे आवाहन श्रीमंत सरदार कुमार महादजीराजे शितोळे सरदार (अंकलीकर) यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळा दि. 24 पासून सुरू होत असून, माउलीच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचे अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथून दि. 14 ला आळंदीसाठी प्रस्थान होणार आहे, यावेळी माहिती देताना श्रीमंत शितोळे सरकार (अंकलीकर) यांनी वरील आवाहन भाविकांना केले आहे.
ते म्हणाले की, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा सुरू होत आहे. वारी दरम्यान माउलींच्या अश्वांचे रिंगण पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या डौलाने सुरू होते. मात्र, या काळात अश्वांच्या दिशेने कोणत्याही वस्तू फेकणे, त्यांना कोणतेही पदार्थ खायला देणे अशा गोष्टी भाविकांनी कटाक्षाने टाळाव्यात,
अंकलीहून माउलींचे अश्व शुक्रवार (दि. 14) सकाळी साडेनऊच्या सुमारास अंकली ग्रामप्रदक्षिणा झाल्यावर मार्गस्थ होणार आहेत. त्यानंतर मिरज (दि. 14), सांगलीवाडी – राममंदिर (दि. 15), इस्लामपूर – पेठनाका (दि. 16), वहागाव (दि. 17), भरतगाव (दि. 18), भुईंज (दि. 19), सारोळा (20), शिंदेवाडी (दि. 21), पुणे (दि. 22) असा अश्वांचा पुण्यापर्यंतचा प्रवास आहे. रविवारी (दि. 23) माउलींच्या अश्वांचा मुक्काम पुण्यातील रस्तेवाडा येथे आहे आणि सोमवारी (दि. 24) सकाळी अश्व आळंदीकडे मार्गस्थ होणार आहेत. आळंदीत अश्वांचे परंपरेनुसार स्वागत करण्यात येईल आणि रात्री श्रीकृष्ण मंदिरात आणि त्यानंतर फुलवाले धर्मशाळेत त्यांचे वास्तव नेहमीप्रमाणे होणार आहे.
हे प्रकार टाळा
अश्वांच्या दिशेने फुले, फळे, तांदूळ, नाणे फेकू नका
त्यांच्या टापांखालची माती कपाळी लावण्यासाठी गर्दी करू नका
अश्वांचे लक्ष विचलित होईल असे कोणतेही कृत्य करू नका
अश्वांच्या माथ्याला, पावलांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका
त्यांना कोणतेही पदार्थ वारीत खाण्यास देऊ नका, त्यांचा आहार ठरलेला असतो, त्याप्रमाणे त्यांना योग्य ते खाद्य दिले जाते.
तुकाराम कोळी रिंगणाचे मानकरी
अंकली ते आळंदी हा सुमारे 11 दिवसांचा प्रवास आहे आणि त्यानंतर पालखी सोहळ्यात मंगळवारी (दि. 25) अश्व माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सोहळा आणि रिंगण काळात माउलींच्या अश्वाचे व्यवस्थापन तुकाराम कोळी (अंकली) हे करणार असून, वयाच्या 15 व्या वर्षांपासून ते वारीतील या महत्त्वाच्या सोहळ्याचे मानकरी आहेत. गेली 20 वर्षे त्यांच्याकडे हे कार्य आहे. या काळात त्यांचे अश्वांकडे विशेष जबाबदारी असतेण
अश्व रिंगणात धावत असतानावस्तू फेकण्यामुळे अश्वांच्या डोळ्याला, कपाळाला लागून इजा शकते आणि पर्यायाने रिंगण थांबवण्याची वेळ देखील येऊ शकते, याबाबत ध्वनिक्षेपकावरून चोपदारांकडून वेळोवेळी सूचना दिलेल्या असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हे प्रकार केले जातात किंबहुना त्यात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. अश्वांना सांभाळणे ही महत्त्वाची बाब वारीत आहे. यासाठीच हे आवाहन करण्यात येत आहे. यात वारकऱ्यांचे अथवा इतर कोणत्याही भक्तांच्या भावना दुखवण्याचा यात उद्देश नाही. वारीची शिस्त द्विगुणित होण्यासाठीचे हे आवाहन करण्यात येत आहे,
– श्रीमंत सरदार ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार, (अंकलीकर)