धामणी-लोणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि. 5) तहसीलदार सुषमा पैकीकरी यांच्या उपस्थितीत दुष्काळ आढावा बैठक पार पडली. यावेळी परिसरातील दुष्काळाची दाहकता पाहता येथे चारा छावणी सुरू करण्याची मागणी सरपंच उर्मिला धुमाळ व उपस्थित विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे जिल्हा बॅंकेने शेतकरी यांच्या खात्यात पैसे जमा केले नसल्याचे सांगितले. लोणी येथे सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाही म्हणून तहसिलदार यांचेकडे तक्रारी केल्या. यावेळी त्यांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले. यावेळी उपसरपंच सुरेखा थोरात, तंटा मुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ, खादी ग्रामोद्यगचे संचालक अमित वाळुंज पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, खडकवाडीचे माजी उपसरपंच किरण वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लंके, माजी सरपंच राजू आदक, सुरेश वाळुंज, प्रकाश वाळुंज, म्हातारबा कौटकर, ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.