नवी दिल्ली – राफेल प्रकरणात न्यायालयाने आज जो निर्णय दिला त्या विषयी प्रतिक्रीया देताना राहुल गांधी यांनी कोर्टाने जे म्हटलेले नाही तेच कोर्टाच्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करून न्यायालयाचा अवमान केला आहे अशी प्रतिक्रीया भाजपकडून देण्यात आली आहे.
राफेल प्रकरणात आज कोर्टाने मोदी सरकारला मोठा दणका दिल्यानंतर त्याच्या बचावार्थ भाजपने आज पुन्हा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना मैदानात उतरवले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर वरील आरोप केला. राफेल निकालावर बोलताना राहुल गांधी यांनी आता न्यायालयानेही चौकीदारही चोर है वर शिक्कामोर्तब केले आहे असे म्हटले आहे. त्या संबंधात निर्मला सीतारामन म्हणाल्या की कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा एक पॅरेग्राफही न वाचता राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. राहुल गांधी या निकालाविषयी जे म्हणाले आहेत ते कोर्टाने म्हटलेले नाही.
यावरून त्यांच्यातील निराशा साफ दिसून आली आहे. न्यायालयापुढे जी कागदपत्रे गैरमार्गाने आणण्यात आली आहेत केवळ त्या एका मुद्द्यावरच कोर्टाने निर्णय दिला आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. कोर्टाच्या या निर्णयाविषयी प्रतिक्रीया देताना राहुल गांधी यांनी साऱ्या मर्यादा पार केल्या आहेत असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनी कोर्टाच्या निकालावर आनंदीत होत पंतप्रधान मोदी हे चोर आहेत हे न्यायालयानेही मान्य केले आहे असे म्हटले होते. त्या एकाच मुद्द्यावर भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोर्टाची आजची ऑर्डर हा सरकारला मोठा झटका आहे काय असे विचारता निर्मला सीतारामन म्हणाल्या की तसे बिलकुल नाही.