चासकमान धरणातून केदारेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडले
राजगुरूनगर- राजगुरूनगर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात चास कमान धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांची पाण्याची समस्या दूर झाली आहे. मात्र, मोसमी पाऊस लांबल्याने पाणीटंचाईची झळ आणखी तीव्र होण्याची चिन्हे गडद झाली आहेत.
राजगुरूनगर शहराला पिण्याच्या पाण्याची भीषणटंचाई निर्माण झाली होती. चास कमान धरणातून 20दिवसांपूर्वी पाणी सोडले होते त्यामुळे केदारेश्वर बंधारा त्यावेळी पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र उन्हाची तीव्रता पाण्याचा उपसा आणि बंधाऱ्यातून होणारी पाणी गळती यामुळे बंधाऱ्यातील पाणी लवकर संपत होते. शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्याने आणि उपलब्ध पिण्याच्या पाण्याची क्षमता यात मोठी तफावत आहे. उन्हाळा असल्याने शहरालगतचे पाण्याचे साठे आटले आहेत.त्यामुळे पाण्याची टंचाई अधिक जाणवत आहे.
केदारेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने दिवसाआड पाणीपुरवठा तोपण 15 ते 30 मिनिटे होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे खासगी टॅंकरच्या माध्यमातून विकत पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. चास कमान धरणातून राजगुरूनगर शहरासाठी पाणी सोडण्यात येते; मात्र बंधारा भरल्यानंतर त्यातील साठा केवळ 20 दिवस साठा पुरतो. त्यामुळे बंधारा पुन्हा कोरडा पडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असून बंधारा भरल्यानंतर धरणातून सोडण्यात येणार पाणी बंद केले जाणार आहे. मान्सून लांबला तर मात्र राजगुरूनगर शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
- शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधारा यावर्षी तीनदा आटल्याने धरणातून पाणी सोडले आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने यापुढे शहरासाठी पाणी मिळेलच याची खात्री नसल्याने उपलब्ध पाणी जपून वापरावे. मान्सून लांबणीवर असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करून नागरिकांना पाणी सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
– शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर नगरपरिषद