सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत, यंदाची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे स्पष्ट केले आहे.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका करत, प्रकाश आंबेडकरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नीती आणि तत्वांनाच तिलांजली दिली असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेविरोधात मोठा संघर्ष लढा दिला, मात्र प्रकाश आंबेडकर हे धर्मनिरपेक्षतेचा खूनच करत असल्याची टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर बोलताना, जातीच्या आधारावरच भाजपने जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिल्याचे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेस पक्षाकडून सुशीलकुमार शिंदे, तर भाजप कडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.