चाकण – बालाजी नगर (मेदनकर वाडी) येथे रस्त्याच्या वादातून चौघांनी मिळून एका महिलेच्या डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना विक्रम शितोळे (वय 42) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अनिल मधुकर हेंद्रे, सुवर्णा हेंद्रे, सिद्धेश हेंद्रे आणि सुशीला शांताराम भुसारे (सर्व रा. मेदनकरवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर मृत कल्पना यांचे पती विक्रम नारायण शितोळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विक्रम शितोळे यांच्या घरासमोरील रस्त्यावरून आरोपी आणि विक्रम यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद होता. याच वादातून आरोपींनी विक्रम यांच्या पत्नी कल्पना घराबाहेर भांडी घासत आरोपींनी कल्पना यांना त्यांच्याच घरात तोंड दाबून उचलून नेले. घरात नेल्यावर त्यांना दगडी पाटा, लाकडी दांडके आणि कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केली. दगडी पाटा डोक्यात घातल्याने कल्पाना गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास चाकण पोलीस तपास करीत आहेत.