मुंबई – मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर कधीपर्यंत सहन करायच? या दहशतवाद्यांना शासन होणार का? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते. आज मोदी सरकारने या प्रश्नावर उत्तर दिले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आता आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारणार. जे आम्ही बोललो आणि करुन दाखवले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील सभेत म्हणाले.
कॉंग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री बदलले जायचे. आम्ही ही संस्कृती बदलून टाकली. आता दहशतवाद्यांनी काही केले तर त्यांना पाताळातूनही शोधून मारु. दहशतवादाला मोदी संपवू शकतो, असे वाटत असेल तर एनडीएला मतदान करा. सरकारचे हात मजबूत करा, असे मोदी म्हणाले.
कॉंग्रेसच्या काळात लोकसभा निवडणुकीच्यावेळी आयपीएलचे सामने दक्षिण आफ्रिकेत हलवावे लागले होते. पण आता नवरात्री झाली. लोकसभा निवडणूकाही सुरु आहेत आणि आयपीएलचे सामनेही. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर आपल्या सरकारची कामगिरी उजवी, असल्याचे मोदींनी सांगितले.
देशात पुन्हा भाजपाप्रणीत एनडीएचे सरकार येणार हा अंदाज अनेक एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. पण एनडीए मागच्या निवडणुकीप्रमाणे 282 जागांचा टप्पा पार करणार की, नाही. ही देशात चर्चा आहे. कॉंग्रेसने 2014च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे 44 जागा जिंकल्या. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी जागा लढवण्याचा विक्रम केला, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
मुंबईचे लोक हवेची दिशा अचूक ओळखतात. त्यामुळे मजबूत होणाऱ्या भाजपाप्रणीत एनडीएचे हात बळकट करा. तीन टप्प्याच्या मतदानानंतर पुन्हा एनडीएचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसची रणनिती भूतकाळात अडकून पडली आहे. कॉंग्रेस कनफ्यूजनचे दुसरे नाव आहे. राजा, वंशवादामध्ये कॉंग्रेस अडकून पडली आहे. मुंबईने नेहमीच शिवसेना-भाजपाला साथ दिली आहे, असे मोदी म्हणाले.
मुंबई भारताची अर्थव्यवस्था चालवते. देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनबरोबर मुंबईचे नाव लागणार आहे. 2006 ते 2014 पर्यंत कॉंग्रेसच्या राजवटीत मुंबईत फक्त 11 किलोमीटर मेट्रो मार्गावर काम झाले. पुढच्या काही वर्षात मुंबईत पावणेतीनशे किलोमीटरचा मेट्रो मार्ग उपलब्ध होईल, असे मोदी म्हणाले.