विधानसभा निवडणुकीत नवीन चेहाऱ्यांना संधी
मुंबई – लोकसभा निवडणुकीतून धडा घेऊन कॉंग्रेसने विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेच कॉंग्रेसला फटका बसला होता. तो धोका टाळण्यासाठी वंचितशी आघाडीचा पर्याय कॉंग्रेसने खुला केला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी कॉंग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपवली आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाण म्हणाले, येणारी निवडणूक महाराष्ट्र कॉंग्रेसच्या दृष्टीने महत्वाची आहे. कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली. समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याआधी पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत नवीन चेहाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तरुण महिलांनाही प्राधान्य असेल. तसेच राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तत्वतः निर्णय घेतला आहे. येत्या 8 दिवसांत राष्ट्रवादीशी चर्चा करून जागा निश्चिती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस इतर समविचारी पक्षांचीही लवकरच बैठक घेणार आहे. 6 जुलैपर्यंत राज्यभरातून इच्छुकांचे अर्ज कॉंग्रेसने मागविले आहेत. त्यातून निवड करून मुलाखती घेतल्या जाणार आहे. स्थानिक प्रश्न कर्जमाफी, कर्ज वाटप या विषयावर आंदोलने केली जाणार आहेत. वंचित आघाडी ही भाजपची “बी’ टीम होती, ही राजकीय टीका होती अशी सारवासारवही त्यांनी केली.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हे विषय वेगळे आहेत. विधानसभेत आघाडीलाच यश मिळेल. मनसेला सोबत घेण्याबाबत अद्याप विचार नाहीत, मतभेद आहेत असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.