जोगवडी- दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा तापमान अधिक आहे. यावर्षी 40 अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे. मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने दांडी मारल्यामुळे हवेतील उष्णाक कायम आहे. गुरुवार (दि. 6) भोर परिसरात ढगाळ वातावरण असल्याने चटक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने तीन ते चार वेळा हजेरी लावली होती, परंतु या वर्षी जून महिन्यात केवळ ढगाळ वातावरण तयार होत आहे, परंतु पाऊस न पडल्यामुळे बळीराजा संकटात पडला आहे.
गेल्या वर्षी मान्सून पावसाला एक जुलैला प्रारंभ झाला होता. सलग सव्वा दोन महिने विश्रांती न घेतल्याने पिकातील गवत देखील काढण्यास वाव मिळाला नव्हता. यामुळे काही ठिकाणी पिकापेक्षा गवतच जास्त माजले होते. तालुक्यातील संगमनेर थांबा ते भुतोंडे रस्ता चिखलमय झाला होता, परंतु यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भोर तालुक्याला इंद्रायणीचे कोठार म्हणून संबोधले जाते. तालुक्यात 7800 हेक्टरवर भातशेतीची लागवड केली जाते.
गेल्या वर्षी सलग सव्वा दोन महिने पावसाने विश्रांती घेतली नव्हती. यानंतर पावसाने दडी मारली. परतीचा पाऊस देखील न झाल्याने काही भागात भातपिके पाण्याविना जळाली होती. तर संगमनेर, नऱ्हे, हर्णस, माजगाव, जोगवडी या परिसरात तुडतुडी रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने भात पिकाला फटका बसला आहे. यावर्षी तरी पावसाने आमच्यावर कृपा करावी, अशी प्रार्थना बळीराजा करीत आहे.
- दरवर्षी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आठ गुंठ्यात आम्ही भातशेती करतो, परंतु गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने भातपिके जळाली होती. आठ गुंठ्यात एकही भाताच्या पोत्याचे उत्पन्न झाले नव्हते. यावर्षी तरी वरुणराजाने आमच्यावर कृपा करावी.
– अनिल बांदल, शेतकरी संगमनेर