कडक उन्हामुळे पाणी आटल्याने मृत्यू
रेडा- उन्हाळ्यांत सर्वत्र दुष्काळाची दाहकता आता वाढत असून कधी नव्हे ते उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या भिमानदी पात्रात असंख्य मासे पाण्याविना तडफडून मृत्युमुखी पडले आहेत. माशांचा खच हिच भीमानदी पात्राची ओळख निर्माण झाली आहे. काही छोटे मासे नदीपात्रातील डबक्यात अखेरच्या घटका मोजत आहेत.
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरात उन्हाच्या तीव्रतेने भीमानदीचे पात्र कोरडे पडल्याने येथील लक्षावधी मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. याच परिसरातील अवसरी, बाभुळगाव, बेडसिंगे, भांडगाव, रांजणी या गावातील उभ्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून या जलचरांना व पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मागील चार दिवसांपूर्वी ही उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, याची कुठलीच दखल प्रशासनाने घेतलेली नाही.
- तातडीने नदीत पाणी सोडण्याची गरज – अभिजीत तांबिले
तीव्र ऊन्हामुळे नदीपात्रातील पाणी आटले आहे. यामुळे लाखो जलचर चिखलात मृतावस्थेत विखुरले आहेत. याबरोबरच पिके ही वाळून चालली आहेत. उजनी प्रशासनाने या दाहक दुष्काळी परिस्थितीचा विचार करून तातडीने नदीत पाणी सोडावे.
– अभिजीत तांबिले, सदस्य, पुणे जिल्हा परिषद