महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अहवालानंतर चार वर्षांनंतरही दुरूस्तीचे काम नाही
भोर- भोरपेक्षा बारामतीला वरदान ठरलेल्या भाटघर धरणाच्या दगडीभिंतीतून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही याबाबत गेल्या काही वर्षांपासून धरण प्रशासन मात्र कानावर हात ठेवण्याची भूमिका घेत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या भिंतीची दुरूस्ती होऊ शकते तर मग भाटघरची का नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून पावसाळ्याच्या तोंडावर तरी या धरणाचे किमान नव्याने स्ट्रक्चर ऑडीट तरी करण्यात यावे, अशी अपेक्षा परिसरातील गावांतून व्यक्त केली जात आहे.
टेमघर धरणाच्या भिंतीमधुन पाण्याची गळती होत असल्याचे प्रकरण (2016) समोर आल्यानंतर धरणाच्या कामाचे गांभीर्य ओखळून या धरणाच्या दुरस्तीचे काम हाती घेण्यात आले. परंतु, भाटघर धरणाच्या दगडी भिंतीतुनही गळीत होत असल्याचे वास्तव असताना या धरणाच्या भिंतीची दुरूस्ती नाहीच शिवाय स्ट्रक्चर ऑडीट करण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे. भोर तसेच पुरंदर, बारामती तालुक्याकरिता महत्त्वाचे असलेल्या भाटघरच्या भिंतींचा केवळ पाहणी अहवालच तयार असल्याचे समोर आले असून भिंतीच्या दुरूस्तीबाबत मात्र कुठल्याच हालचाली प्रशासकीय पातळीवर झाल्या नसल्याची वस्तुस्थिती आहे.
टेमघर आणि भाटघर या दोन्ही धरणांची पाहणी करण्याचे आदेश राज्य सरकारने जलसंपदा विभागास दिले होते. त्यानुसार नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही धरणांची पाहणी पूर्ण करून अहवाल तयार केले. यानुसार टेमघर धरणाच्या भिंतीच्या दुरूस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली, हे कामही तत्काळ सुरूही करण्यात आले. परंतु, भोर, पुरंदर, बारामतीला पाणी पुरवठा होणाऱ्या भाटघर धरणाच्या भिंतीच्या दुरूस्तीची बाब अद्यापही गांभीर्याने घेतलेली नाही. 2016 ते 2019 या चार वर्षात धरणाच्या भिंतीची अवस्था अधिकच बिकट झाली असावी, यामुळे भाटघर धरणाची पाहणी पुन्हा नव्याने करावी लागणार आहे.
बारामती आणि पुरंदर तालुक्याचे जलनियोजन भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असताना या धरणाच्या दुरूस्तीकडे, देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे अधिकारी, अभियंत्यांनी या धरणाची पाहणी आतापर्यंत दोन वेळा करून गेल्याचे सांगितले जाते. परंतु, धरण भिंतीच्या दुरूस्तीचा निर्णय घेतला गेलेला नाही. धरण प्रशासनाशी संपर्क साधला असता, तीन वर्षातून एकदा या धरणाच्या भिंती तसेच मोऱ्यांची तपासणी केली जात असल्याचे तसेच मे ते जून महिन्या दरम्यान अशी पाहणी करण्यात आली असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचे काम प्रशासनाकडून केले जाते. या अहवालावर अभ्यास सुरू असल्याचेच सांगितले जाते. यामुळे भाटघर धरणाच्या भिंतीची दुरूस्ती झाली नाही तरी किमान स्ट्रक्चर ऑडीट तरी करावे, अशी अपेक्षा लगतच्या गावांतून व्यक्त केली जात आहे.
- नुसतीच पाहणी, निर्णय नाही…
भाटघर धरणाच्या वीज जनरेशन केंद्राजवळील दगडी भिंतीतून गळतीचे प्रमाण वाढल्यानंतर भिंत फुटण्याचा धोका लक्षात घेऊन याबाबत अतिदक्षता घेत धरणाच्या भिंतीची पाहणी करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेला करण्यात आल्या होत्या, या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी भाटघर धरणाची पाहणी करीत अहवाल दिला आहे. त्यानंतरही तिसऱ्या वेळी अधिकारी येऊन गेल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात येते. परंतु, धरणाच्या भिंत दुरूस्तीबाबतच्या हालचाली मात्र गेल्या चार वर्षात झालेल्या नाहीत. तसेच, शासनाकडे अहवाल दिला की नाही. दुरूस्ती कधी होणार? याबाबत धरण प्रशासनाला काहीच माहिती नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात धरण प्रशासन अभियंता अरूण नलावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नेहमीप्रमाणे ते आऊट ऑफ कव्हरेज होते.