खासदार आढळराव : वाघोली येथे प्रचारार्थ कोपरासभा
वाघोली- बैलगाडा शर्यत सुरू झाल्यावर घाटात घोड्यावर बसणार असल्याचे सांगत फिरत आहेत, ते सगळे ठीक आहे. पण, शर्यती कोण सुरू करणार हे मात्र, सांगत नाहीत. हे शर्यतबंदीचे पाप तुमच्याच नेत्यांचे आहे. तुम्हाला बैलगाडा शर्यत बंदीचा इतिहास माहित तरी आहे का? तुम्हाला स्क्रीप्ट लिहून देणाऱ्यांनी ही बंदी तुमच्या राष्ट्रवादीनेच घातली हे सांगितले नाही का? याचे उत्तर द्याल का? अशी एकामागोमागएक प्रश्नांची सरबत्ती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयतक्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वाघोली येथे झालेल्या कोपरासभेत खासदार आढळराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके, तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंडरे, रामदास दाभाडे, दादासाहेब सातव, संजय सातव पाटील, काळुराम मेमाणे, नारायण आव्हाळे, जिल्हा संघटक श्रद्धी कदम, तालुका संघटक सविता कांचन, पूनम चौधरी, युवराज दळवी, राजेंद्र तांबे, मिलिंद हरगुडे, रमेश भोसले, चित्तरंजन गायकवाड, सुनील कांचन, काका कुंजीर, माऊली माथेफोड, स्वप्नील कुंजीर, अनिल कुंजीर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी खासदार आढळराव पाटील यांनी हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरळीकांचन, शिंदवणे, वळती, तरडे, सोरतापवाडी, पेठ, नायगाव, थेऊर, कोलवडी, केसनंद, आव्हाळवाडी आदी गावांचा दौरा केला.
- खासदार आढळराव म्हणाले की, वाघोलीसह हवेली तालुक्यातील गावांसाठी मी स्वतः लक्ष देऊन विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. एकट्या वाघोली गावात माझ्या प्रयत्नांतून 30 कोटींहून अधिक रकमेची कामे झाली आहेत. हवेली तालुक्यातील सर्व गावांसाठी मिळून 43 कोटीपेक्षा अधिक निधी विकासकामांसाठी दिला आहे. वाघोली गावासाठी सुधारीत पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आमदार पाचर्णे आणि मी प्रयत्न केले, त्यामुळेच पीएमआरडीएच्या बजेटमध्ये 25 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
- नागरिकांना आढळराव पाटील यांच्यासारख्या लोकनेत्याची गरज आहे. मनोरंजन वगैरे ठीक आहे, पण अशांना संसदेत पाठवून आपल्या पायावर धोंडा मारुन घ्यायचाय का?.
– बाबुराव पाचर्णे, आमदार, शिरूर-हवेली