11 गावांच्या समस्यांची बैठक
पुणे महापालिकेचा प्रताप
पुणे : महापालिकेतील समाविष्ट 11 गावांच्या समस्यांसाठी महापालिकेत बोलविण्यात आलेल्या बैठकीतील उपस्थितांना पालिकेकडून चक्क उष्टे पाणी पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी ( दि.13) रोजी महापालिकेत लोकअदालत होती. या अदालतीत आलेल्या नागरिकांना महापालिकेकडून प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या होत्या. ज्या नागरिकांनी अर्धवट पाणी पिले आणि रिकाम्या झालेल्या बॉटल पुन्हा महापालिकेच्या कक्षात ठेवल्या याच बाटल्यांमध्ये रविवारी पुन्हा बैठकीसाठी आलेल्या नागरिकांना पाणी देण्यात आले. या माहितीस पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिला. तर काही कर्मचाऱ्यांकडून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता.
राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी दुपारी 12 वाजता महापालिकेत ही बैठक बोलाविली.या बैठकीस आमदार शिवतारे यांच्यासह, आमदार भिमराव तापकीर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांच्यासह 11 गावांचे नगरसेवक गणेश ढोरे तसेच अश्विनी पोकळे यांच्यासह, या गावांमधील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सोसायटयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपस्थितांना पिण्यासाठी पालिकेकडून पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या. मात्र, यातील कोणत्याही बॉटल सिल केलेल्या नव्हत्या. अचानक सुमारे अडीचशेहून अधिक नागरीक उपस्थित झाल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे त्यातील काही जणांनी लोक अदालतीमधील पाणी संपलेल्या बाटल्या वापरण्याचे जुगाड केले. मात्र, या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्यांना बसला असून पालिकेच्या कृपेने लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सर्वासामान्य नागरिकांना उष्टे पाणी पिण्याची वेळ आली.
———————