ढाका – बांगलादेशातील कोक्स बाजार येथील छावण्यांमधील रोहिंग्यांच्या पुनर्वसनाला प्रारंभ झाला आहे. त्यांना भशान चार बेटावर नव्याने विकसित करण्यात आलेल्या सुविधेत स्थानांतरित करण्याची प्रक्रिया बांगलादेश सरकारने गुरुवारी सुरू केली. कोक्स बाजारातल्या उखिया महाविद्यालयातून शेकडो रोहिंग्यांना भशान चार बेटावर नेण्यासाठी चट्टोग्राम बंदरात नेण्यात आले. या रोहिंग्यांना स्वेच्छेने या पुनर्वसनामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.
सरकारने आपत्ती निवारणासाठी आणि त्यांच्या आरामदायक जगण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत, असे शरणार्थी मदत व प्रत्यार्पण कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त मोहम्मद शमसुद दोझा यांनी सांगितले. या पुनर्वसनाच्या प्रक्रियेदरम्यान रॅपिड ऍक्शन बटालियन आणि पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तथापि, पुनर्वसनासाठी स्थलांतर करण्याची प्रक्रिया आणि भशान चार बेटावर नेण्यात आलेल्या शरणार्थींची संख्या याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या रोहिंग्यांसाठी अधिक चांगल्या निवास व्यवस्थेची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने बुधवारी ठेवला. ज्या रोहिंग्यांनी भशान चार येथे जाण्याचा प्रस्ताव निवडला आहे त्यांना मूलभूत मानवाधिकार असावेत. त्यामध्ये मुख्य भूभागात जाणे आणि तेथून येण्याचे स्वातंत्र्य असावे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींही असाव्यात असेही संयुक्त राष्ट्राने आवर्जून सांगितले आहे.