पुणे – घरातील महिलांना विनाकारण त्रास दिला म्हणून एका नेपाळी व्यक्तीस दांडके, बॅट तसेच लाथेने मारहाण करण्यात आली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.
अर्जुन लामीछाने (35, मूळ नेपाळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे राजेश ईश्वर जाधव (45), रमेश बालाजी बक्के (29), बाबुराव कानीराम राठोड (40,रा.भैरवनाथ मंदिराजवळ, खराडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे तिघेही रोजंदारीवर काम करतात. तर अर्जुन हा कामाच्या शोधात पुण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हा नेपाळ येथील लुमिनी राज्यातील नवलपूर येथील आहे. तो काम शोधण्यासाठी काही दिवसांपूर्वीच खराडी येथे आला होता. येथे तो त्याच्या गावाकडील काही व्यक्तींसोबत राहात होता. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने शेजारी रहाणाऱ्या एका महिलेच्या घराचा दरवाजा वाजवून पाणी मागून त्यांना त्रास दिला.
याबाबत तेथील रहिवासी आरोपी राजेश जाधव याने त्यास जाब विचारला. यामुळे चिडून अर्जुन याने त्याला हाताने मारहाण करुन दगड मारला. याच वेळी त्याने दुसरा आरोबी बाबु राठोड याच्या पत्नीचा अचानक हात धरला. यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाल्यावर तो तेथून निघून गेला होता. दरम्यान, आरोपींनी त्याला पहाटे सव्वापाचच्या दरम्यान खराडी गावठाण येथील नाल्याच्या जवळ गाठले. तेथे राजु जाधव यांने धोपटण्याने, रमेश बक्केने लाकडी दांडक्याने व बाबुराव राठोड याने लाथेने मारहाण केली. तो बेशुद्ध पडला असावा, असे समजून ते तेथून निघून गेले होते. मात्र, मार वर्गी लागल्याने अर्जुनचा मृत्यू झाला. अर्जुनच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो थोडा वेडसर असल्याने अशाच प्रकारे वागत होता. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वराळ करत आहेत.