पुणे – माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील अनुकंपा व न्यायालयीन प्रकरणातील नवीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीत नोंदणी करण्याचे प्रस्ताव प्राधान्याने निकाली काढावे लागणार आहेत. याबाबत शिक्षण संचालकांनी आदेश दिले आहेत.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीत नोंद करण्याच्या कार्यपध्दतीत बदल करण्यात आला आहे. राज्यातल्या विविध विभागीय शिक्षण उपसंचालकांना याबाबतचे अधिकार देण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे प्रस्तात पाठविला होता. त्यास शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. यामुळे प्रलंबित पडलेले नोंदणीचे प्रस्ताव आता मार्गी लागण्यातील अडथळा दूर झाला आहे.
अनुकंपा तत्वावर अनेकांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल करुन नियुक्त्या प्राप्त केलेल्या आहेत. न्यायालयाने शालार्थ प्रणालीत नावे नोंदविण्यासाठी कालमर्यादाही घालून दिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणांचा आधी निपटारा करणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांमधील शिक्षकांची नोंदणी करताना 30 जून 2016 नंतरची नियुक्ती असल्यास संबंधित शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण असण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे प्रणाली नाव नोंदणी करताना या सर्व बाबींचा विचार करावा, असे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी आदेशात नमूद केले आहे.