वडगावशेरी – वडगावशेरी परिसरातील खराडी आणि विमाननगर परिसरातील आयटी हबमुळे या ठिकाणी हॉटेल आणि दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या व्यवसायिकांनी ठिकठिकाणी अतिक्रमणे करुन शेड उभारल्या आहेत.अतिक्रमणांबरोबरच कुठल्याही व्यवसायिकाने अग्निशामक यंत्रणा सुद्धा उभारलेली नाही. यापुर्वी सुद्धा आगीचे अनेक प्रकार घडले असताना अद्याप प्रशासनाने सुद्धा याबाबत कुठलीच जागरुकता दाखविलेली नाही.
पुणे शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना नागरिकांच्या सुरक्षेकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लेक्ष केले जात आहेत. खराडी, विमाननगर परिसरात मोठमोठे मॉल्स आहेत. या मॉल्सच्या बाजूला अनेक छोट्या टपऱ्या किंवा छोटी दुकाने आहेत. या सगळ्या ठिकाणी पाहणी केली असताना मॉल्स असो व छोटी दुकाने कुठेही अग्निरोशन यंत्रणा असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या भागात जर आगी सारखी दुर्घटना घडली तर तातडीने मदत मिळणे अवघड होणार आहे.याबाबत प्रशासनाने सुद्धा दखल घेतलेली नाही.
तातडीची अग्निशमन यंत्रणा तर कुठे दिसत नाही त्याचबरोबर पालिकेचे अग्निशमन केंद्र सुद्धा जवळ नाही.ऐवढ्या मोठ्या परिसरासाठी एकमेव येरवडा येथे अग्निशमन केंद्र आहे.खराडी येथे जर आगीचा प्रकार घडला तर येरवड्याहून अग्निशमनाची गाडी येण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागतो.त्यामुळे मोठी हानी झाल्याचे प्रकार सुद्धा यापुर्वी घडलेले आहेत.गेल्या एका वर्षापासून आत्तापर्यत या परिसरात छोट्या मोठ्या आगीच्या तब्बल 148 घटना घडल्या आहेत.वर्षभरात ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर आगीच्या दुर्घटना घडून सुद्ध्र प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.गेल्या पाच वर्षात कुठलेही प्रयत्न अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी झालेले नाहीत.
नगर रस्त्यावरील हडपसर बायपास रोडवरील 14 गुंठे जागा अग्निशामक दलाच्या केंद्रासाठी मंजूर झाली आहे पण त्याठिकाणी अद्याप काम सुरु झालेले नाही येत्या वर्षभरात हे काम पुर्ण होईल.नगरसेवक महेंद्र पठारे यांनी ही जागा दिली आहे
ना-हरकत प्रमाणपत्र नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
हॉटेल किंवा ज्याठिकाणी पदार्थ बनविले जातात त्याठिकाणी अग्निशामक दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते पण याठिकाणी छोटे-मोठे शेकडो अशा प्रकारचे व्यवसायिक आहेत पण त्यांनी अशाप्रकारचे प्रमाणपत्र घेतलेले नाही.अनेकांकडे याबाबत चौकशी केली असता असे प्रमाणपत्र घ्यावे लागते हेच अनेक व्यवसायिकांना माहिती नव्हते. अग्निशामक दलाच कुठलाही धाक राहीला नसल्यामुळेच सर्रास नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे. असे प्रमाणपत्र नघेणाऱ्या व्यवसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अग्निशामक दलाची हतबलता
नगररोड वरील वाहतुकीकोडीमुळे बंब उशिरा येण्याचे प्रकार होतात व अनेक ठिकाणी अंतर्गत आखूड रस्ते असतात त्यामुळे बंब पोहचत नाहीत. आग लागल्या ठिकाणी वेळेत न पोहचता आल्याने अग्निशामक दलाचे कर्मचारी मात्र अनेक वेळा हतबल होताना दिसतात.
वर्षभरातील आगीच्या घटनांची आकडेवारी
कमी तीव्रतेच्या घटना -78 प्रकार
मध्यम तीव्रतेच्या घटना – 58 प्रकार
मोठ्या घटना -12 प्रकार