रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत ः खेड तालुका प्रभारी कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
राजगुरूनगर- रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा 2019-20 साठी शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन खेड तालुका प्रभारी कृषी अधिकारी नंदू वाणी, मंडल अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. मात्र, निसर्गचक्रापुढे कधी कधी अपयश येत आहे, त्यामुळे नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा करणे आवश्यक आहे. यावर्षी सुरुवातील भयावह दुष्काळ त्यानंतर अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शासकीय मदत ही केवळ तुटपुंजी असल्याने हे नुकसान कधीच भरून येणारे नसल्याने पीक विमा गरजेचा झाला आहे.
- खरीपाच्या विम्याची भरपाई अजूनही मिळाली नाही
खेड तालुक्यात खरीप हंगामासाठी 323 बिगर कर्जदार शेतकरी, 3097 कर्जदार शेतकरी अशा 3420 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. तालुक्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असूनही पीक विमा काढलेल्या शेतकऱ्याना विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि विमा कंपनी बाबत तीव्र नाराजी आहे. नुकसान भरपाई विमा कंपनीकडून वेळेत मिळत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. अनेक शेतकरी विमा कंपन्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. - दरम्यान शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून रब्बी हंगामासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांचा पीकविमा भारती एक्सा जनरल इन्शुरन्सच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे, तर उन्हाळी भुईमूगसाठी 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तालुक्यातील महा-इ-सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधारकार्ड आणि बॅंक खात्याच्या तपशील घेऊन जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- रब्बी हंगामासाठी विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे-
अन पीक विमा संरक्षित रक्कम (हेक्टरी) शेतकरी विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टरी
1 गहू (बागायती) 33,000 रुपये 495 रुपये
2 ज्वारी (बागायती) 26,000 रुपये 390 रुपये
3 ज्वारी (बागायती) 24,000 रुपये 360 रुपये
4 हरभरा 24,000 रुपये 360 रुपये
5 उ. भुईमूग 38,000 रुपये 570 रुपये
6 कांदा 70,000 रुपये 3500 रुपये