महावितरण, घरमालकाच्या निष्काळीपणाचा कळस
पुणे : वय अवघं साडेतीन वर्षांच; मात्र, जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय काढून टाकण्याचा सल्ला दिला….पोटच्या लेकराला असं डोळयासमोर मरताना पाहणे शक्य नसल्याने आई-वडीलांनी डॉक्टरांचा सल्ला मान्य करत हात-पाय कापण्याला संमती दिली.. मात्र, त्यामुळे आता त्याला पुढचं आयुष्य जगायचं सोबत आयुष्यभराच अपंगत्व घेऊन…. तेही कोणताही दोष नसताना….हा विदारक प्रसंग ओढावला आहे.
बिबवेवाडीतील आदी गणेश गायकवाड महावितरणच्या डीपीचा शॉक बसून गंभीर जखमी झाला असून गेल्या महिन्यभरापासून तो मृत्युशी झुंज देत आहे. त्याततच हातावर पोट असलेल्या आदीच्या उपचारासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल दहा लाखांचा खर्च येणार असून कोणतरी आपल्याला मदत करेल या विश्वासावर त्याचे आई वडील मदतीकडे डोळे वाट लावून आहेत.
“घरमालकाने इमारत एमएसईबीच्या डीपीला केवळ एक फुटाचे अंतर ठेऊन बांधली आहे. या टेरेसवरुन एखाद्या व्यक्तीचा हात सहज डीपपर्यंत पोहचू शकतो. इमारत बांधताना लोकांच्या जीवाची कोणतीच काळजी घेतली गेली नाही. तसेच महावितरणनेही इमारत बांधताना कोणतीही हरकत घेतली नाही.’
ही दुर्देवी दुर्घटना दि.18 एप्रिल रोजी सच्चाईमाता मंदिर परिसरात घडली होती. एका भाड्याच्या घरामध्ये ते राहतात. तेथेच भिंतीलगत महावितरणचा ही डीपी उघडा होता. तर, टेरेसची भिंत फक्त दीड ते दोन फुट उंच आहे. घटनेच्या दिवशी आदि हा टेरेसवर खेळत असताना त्याचा या डीपीला स्पर्श झाला. यामुळे शॉक लागून तो फेकला गेला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान डॉक्टर त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय कापावे लागले आहेत. गणेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरमालक व महावितरणचे तत्कालिन अधिकारी घटनेला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
आदीसाठी मदतीची साद
आदीचे वडील टेलरींगचे काम करतात, कटाकटीने कुटूंबाचे पोट भरेल ऐवढे पैसे ते कमावतात, मात्र, आता पोटच्या लेकराची ही अवस्था झाल्याने त्यांचे कामही बंदही आहे. त्यातच आदीच्या पुढील उपचारासाठी 10 लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. त्याच्यावर ससून सर्वेपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातच आता आदीला दोन्ही हात आणि पाय नसल्याने त्याला आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या कुटूंबावर येऊन पडली आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्याचे वडिल गणेश गायकवाड यांनी केले आहे.