वाल्हे- केंद्रीय 14व्या वित्त अयोगाच्या निधी वाटपात अन्याय झाला असल्याच्या आरोपावरून वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने सासवड येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 11) धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थितीत खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले.
वाल्हे ग्रामपंचायतीमधून फारकत घेतलेल्या आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी या गावांना सन 2011च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या प्रमाणात 14व्या वित्त अयोगाचे वाटप नुकतेच करण्यात आले. मात्र, या विभक्त गावांमधून जवळपास 1 हजार 775 मतदान अद्यापही वाल्हे ग्रामपंचायतीतच समाविष्ट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वाल्हे गावची सध्याची लोकसंख्या 4 हजार 747 असली तरी विभक्त गावातील समाविष्ट मतदानामुळे गावच्या लोकसंख्येत तफावत निर्माण होऊन लोकसंख्येचा आकडा 6 हजार 522 वर गेला आहे.
अशातच शासनाकडून वाल्हे गावास फक्त 4747 एवढ्याच लोकसंख्येच्या प्रमाणावर केंद्रीय 14व्या वित्त आयोगाच्या निधीचे वाटप करण्यात आल्याने जवळपास 1775 एवढ्या वाढीव लोकसंख्येचा भार वाल्हे ग्रामपंचायतीला नाहक सोसावा लागत आहे. यापूर्वी वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने निधी वाटपात होणाऱ्या अन्यायाबाबत प्रशासनाकडे दाद मागितली होती. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात सरपंच अमोल खवले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष समदास भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते सचिन दुर्गाडे, अमोल भुजबळ, हनुमंत पवार, दादा म्हेत्रे, देवीदास पांडकर, सूर्यकांत भुजबळ, फत्तेसिंग पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व महिला सहभागी झाल्या होत्या.