विदेशी पेयांची तरुणांना भुरळ ः अतिसेवन ठरू शकते घातक
पेठ-ग्रामीण भागामध्ये आज लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत कृत्रीम शीतपेय पिण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ती एक फॅशन बनू पाहत आहे. आज जागतिकीकरणामुळे या शीतपेयावर प्रत्यक्ष बंदी आणता येत नसली तरी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हे प्रमाण निश्चितच कमी करू शकतो. लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळपाणी, ऊसाचा रस ही देशी शीतपेय स्वस्त आणि आरोग्यवर्धक असून उन्हाळ्यामध्ये आपण याचे सेवन करण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे.
विदेशी शीतपेयांमुळे मधुमेह, स्थूलत्व, दातांची हानी, हृदयरोग या आजारांना जणू खतपाणीच घातले जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपल्या भारतासारख्या विकसनशील देशात जाहिरातींचे प्राबल्य तर खूप जास्त प्रमाणात आहे आणि आरोग्यास हानिकारक अशा शीतपेयांच्या जाहिराती तर लोकप्रिय कलाकारांच्या अवास्तव स्टंटबाजीने पुरेपूर असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जीवघेणे साहस करून मग शीतपेयाची बाटली एका दमात रिचविली जाते आणि आमची तरुण पिढी आणि लहान मुले यांना हे पेय पिण्यास भुरळ पाडली जाते.
देशातील ही सद्य परिस्थिती बदलण्यासाठी या लोकप्रिय कलाकारांच्या तोंडूनच आरोग्यास हानिकारक शीतपेयांची योग्य माहिती लोकांसमोर आणावयास हवी. लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी आदी नैसर्गिक पेयांचे महत्त्व वारंवार त्यांच्यासमोर आणले गेले पाहिजे. एकंदरीतच लोकांच्या हिताचे आणि आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. कृत्रीम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.
उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो याचा आपल्याला विसर पडतो.
- विदेशी पेयांचे दुष्परिणाम
कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक ऍसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, ऍल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक ऍसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच. - दुर्धर आजारांना आमंत्रण
शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. कोणतेही 350 मिलीलिटर (ज्यामध्ये 31. 5 ग्रॅम साखर असते. ) शीतपेय एकावेळी घेतल्यास ऊळरलशींशी-2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता 20% बळावते. शीतपेय माणसाच्या यकृताला आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचविते आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देत असतो.