तर्डोबाचीवाडी येथील स्थितीची मोबाईलव्दारे माहिती
शिरूर- दुपारी एकची वेळ… सरपंच धनश्री मोरे यांच्या मोबाइलची रिंग वाजती. फोन घेताच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलतोय, नमस्कार … हे शब्द ऐकताच मोरे यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. आपण तर्डोबावाडी गावच्या सरपंच का…हो आपल्या तर्डोबावाडी गावात दुष्काळाची काय परिस्थिती आहे …असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरपंच मोरे यांच्याशी संवाद साधत दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर हतबल झालेले प्रशासन अवघ्या काही मिनिटांत सक्रिय होऊन निवारणाच्या तयारीला लागल्याचा प्रत्यय तर्डोबाचीवाडीकारांना आली.
शिरूर तालुक्यातील तर्डोबाचीवाडी येथील दुष्काळाची दाहकता ओळखून मुख्यमंत्र्यांनी गावच्या कारभाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधून आढावा घेतला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या गावची ऐन दुष्काळात आस्थेने विचारपूस करीत आहेत. यावर सरपंच मोरे यांचा काहीवेळ विश्वासच बसत नव्हता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिरूर तालुक्यातील निर्वी, सोनेसांगवी येथील सरपंच यांच्याशी दुष्काळाबाबत चर्चा केली. आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्रयत्न करून गव्हाणवाडी फाट्यावरून पाणी तर्डोबावाडी, गोलेगाव भागात सोडले आहे, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवर्जून सांगितले. आज या भागात पाणी पोहचेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सांगितले. दोन ते अडीच मिनिटे त्यांनी गावकारभाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी सरपंच धनश्री मोरे म्हणाल्या की, तर्डोबावाडी गाव घोडनदीच्या किनारी जरी असले तरी यंदा या भागात पाऊस कमी झाला आहे. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून तीन महिन्यांपासून नदीपात्र कोरडे पडले आहे. विहिरीतील पाणी पातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.चारा, शेतीच्या पाण्याचा ही प्रश्न गंभीर बनला आहे, अशी विदारक स्थिती मांडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर मिळावा म्हणूक तर्डोबावाडी ग्रामपंचायतींच्या वतीने महसूल खात्याकडे, पंचायत समितीकडे प्रस्ताव दिला आहे. परंतु तर्डोबावाडी गाव नदीकाठी आहे म्हणून प्रशासन प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेकवेळा तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना भेटून तर्डोबावाडी ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याचा टॅंकरद्वारे पाणी वाटप व्हावे, अशी मागणी करूनही पाणी मिळत नाही, असे गाऱ्हाणे त्यांनी मांडले. त्यासाठी अखेर स्वतःच्या खर्चातून पाण्याचे टॅंकर लावून पाणी वाटप करीत असल्याचे सरपंच धनश्री मोरे यांनी सांगितले.
आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्रयत्न करून नुकतेच गव्हाणवाडी फाट्यावरून पाणी तर्डोबावाडी, गोलेगाव भागांत सोडले आहे, असेही सांगितले. आज पाणी या भागात पोहोचेल असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे दोन ते अडीच मिनिटे संवाद साधून दुष्काळी व्यथा जाणून घेतल्या.
- अनेकवेळा शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारले. परंतु सत्य परिस्थितीला बगल देण्याचे काम महसूल, पंचायत समितीने केले आहे. परंतु ऐन दुष्काळात आमच्या गावची व्यथा स्वतः मुख्यमंत्री फोन करून विचारपूस करतात. तेव्हा मुख्यमंत्री प्रत्यक्षात भेटल्याचा आनंद होत आहे. त्यांच्या एका फोनमुळे प्रशासन काही वेळात हलवले गेले, हीच खरी जनतेविषयी आस्था आणि कदर असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आहेत.
– धनश्री मोरे, सरपंच, तर्डोबावाडी.