आमदार राहुल कुल यांनी दिली माहिती ः वीजनिर्मितीसाठी पर्याय उपलब्ध
दौंड- टाटा धरणाचे पाणी हे पूर्वमुखी वळविण्याबाबत राज्य शासन ठाम असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. टाटा धरणाचे पाणी हे पूर्वमुखी होते. मात्र, वीज निर्मितीचा प्राधान्यक्रम ठरवून ते पाणी पश्चिमेकडे वळविण्यात आले होते व त्यावर वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. सध्या विजेला अनेक पर्याय उपलब्ध आहे किंबहुना विजेची उपलब्धताही झाली आहे. मात्र, सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता पाण्याची टंचाई ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे आता पाण्याला प्राधान्यक्रम देण्याची वेळ आली आहे. हे मुळचे पूर्वमुखी असणारे पाणी पूर्व बाजूकडे वळविले पाहिजे, याबाबत विधानसभा सभागृहामध्ये तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने मागणी केली, त्यामुळे या मागणीची दखल घेऊन त्यावर एक कमिटी नेमण्यात आली. या कमिटीत आमदार कुल यांची नेमणूक करण्यात आली असून, या कमिटीने अहवाल तयार केला आहे. मात्र त्यावर कमिटीतील सदस्य या नात्याने त्यांनी आक्षेप नोंदविला आहे, त्यामुळे कमिटीचा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय सरकारचा आहे. मात्र, शासन हे टाटाचे पाणी पूर्वमुखी वळविण्याबाबत सकारात्मक असल्याचे कुल यांनी सांगितले.
याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा झाली असून टाटाशी आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी एक नवीन समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासन हे टप्प्याटप्प्याने पाणी वळविण्याबाबत सकारात्मक आहे. मात्र निर्णयासाठी येणारे अडथळे यदूर करत हे पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे कुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वास्तविक टाटाचे पाणी टप्प्याटप्प्याने वळविण्यासाठी कमिटीची स्थापना केली होती. मात्र, या कमिटीतील सदस्यांनी व अध्यक्षांनी हे पाणी वळविण्याबाबत चर्चा करण्याऐवजी वीजनिर्मिती बंद होईल, वीज कमी पडेल, याचीच चर्चा जास्त केली. त्यामुळे मूळ कमिटीच्या स्थापनेतील हेतूच बाजूला राहिल्याने त्यावर वेळोवेळी हस्तक्षेप नोंदविले गेले आहेत. टाटाचे पाणी पूर्वमुखी करून ते पूर्वेकडील भागाला कसे देता येईल, याचा अभ्यास केला असून, लवकरच याबाबत धोरण जाहीर होईल, तसेच महाराष्ट्र राज्य पाणी लावाद-2 नुसार ज्या काही अडचणी आहेत त्याही दूर करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे कुल यांनी सांगितले. हे पूर्वमुखी पाणी भीमा नदीत सोडले तर उजनीतून ते थेट मराठवाड्यातही जाऊ शकते, असा व्यापक दृष्टिकोन या टाटाच्या पाण्याचा होऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
- आक्षेपांचा विचार करून सरकार निर्णय घेईल
सध्याची पाण्याची गरज लक्षात घेता हे पाणी पूर्वेकडे वळविणे गरजेचे असल्याचे सांगत यासाठी निवडून आल्यानंतर सभागृहात पहिल्या दिवसापासून याचा पाठपुरावा सुरू केल्याचे कुल यांनी सांगितले. मागील काही दिवसात काही वर्तमानपत्रांमध्ये या बैठकीतील समिती सदस्य म्हणून तुम्ही उपस्थित नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याबाबत पत्रकारांनी कुल यांना विचारले असता कुल म्हणाले की, आम्ही सर्वच बैठकांना हजर होतो. मात्र, मागील दोन-तीनच बैठकांना लोकसभा निवडणुकीमुळे उपस्थित राहू शकलो नसल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र पाणी आणण्यासाठी जे करायचे आहे त्यातूनच किमिटीच्या अहवालावर आपण आक्षेप घेतले आहेत त्यामुळे आमच्या आक्षेपांचा विचार होऊनच राज्य सरकार निर्णय घेईल.