डॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
अणे- जनतेला काय सुविधा दिल्या?, तरुणांना रोजगार मिळाला का? 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली? हे साधे सरळ प्रश्न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
- आता शेतकऱ्यांना कळून चुकले आहे की 15 वर्षे आपली वाया गेली आहेत. त्यामुळे परिवर्तनासाठी ते एकवटले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचे वाली नाहीत तर श्रीमंतांचे राखणदार आहेत. अशा सरकारला आणि त्यांच्या “सेवकां’ना धडा शिवकवण्याची हीच वेळ आहे.
बाबाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, नळावणे