थेरेसा मे यांच्याकडून पुन्हा एकदा खेद व्यक्त
लंडन – स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अमृतसरमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडासंदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी पुन्हा एकदा खेद व्यक्त केला आहे. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी अमृतसरमध्ये ब्रिटीश सैन्याने कर्नल रेगिनाल्ड डायरच्या आज्ञेवरून शांतपणे निदर्शने करणाऱ्या हजारोंच्या समुदायावर बेछुट गोळीबार केला होता. त्या घटनेला नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली. बैसाखी निमित्ताने लंडनमध्ये डावनिंग स्ट्रीटवर संध्याकाळी आयोजित स्वागत समारंभामध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेबद्दल पुन्हा एकदा तीव्र खेद व्यक्त केला. ही घटना म्हणजे ब्रिटीश भारताच्या इतिहासातील एक लाजिरवाणा डाग असल्याचे त्या म्हणाल्या.
“त्या दुर्दैवी दिवशी जे काही झाले, त्याबाबत जो कोणी ऐकतो. तो हेलावून जातो. 100 वर्षांपूर्वी त्या दिवशी त्या बागेमध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये काही अशुभ घडण्याबाबत शंकाही आलेली नसावी. मात्र आमच्या इतिहासात सर्वात वाईट प्रक्षोभ निर्माण करणारी ही घटना होती.’ असे मे म्हणाल्या. माजी पंतप्रधान एच.एच.ऍसक्विथ यांनीही या बाबत दुःख व्यक्त केले होते, याची आठवण करून दिली. मात्र औपचारिकपणे माफी मागण्याचा दिलदारपणा त्यांनी दाखवला नाही.
या एकत्रीकरणाला जमा झालेल्या शेकडो भारतीय नागरिकांनी ब्रिटन सरकारने माफी मागण्याची मागणी केली होती. यापूर्वी थेरेसा मे यांनी संसदेत या घटनेबाबत खेद व्यक्त केला होता. मात्र माफी मागितली नव्हती.