पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धा 2019 मध्ये सहभाग
वासुंदे- जराडवाडी (ता. बारामती) गावाने आपले गाव पाणीदार करण्यासाठी 500 लोकांच्या श्रमदानाने सिनेअभिनेते हार्दिक जोशी (तुझ्यात जीव रंगला फेम राणादा) आणि अक्षया देवधर (तुझ्यात जीव रंगला फेम अंजलीबाई) यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 8) रात्री कंबर कसली. 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान होणाऱ्या पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धा 2019 मध्ये सहभागी होत स्पर्धेचा शुभारंभ केला.
या श्रमदान शुभारंभप्रसंगी राणादा व अंजलीबाई यांच्या हस्ते मशालफेरी काढण्यात आलीण श्रमदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची यावेळी पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये गावातील ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान लेझीम, पथनाट्य लोकांसमोर सादर करण्यात आले, तसेच पाणी बचतीचे महत्त्वही ग्रामस्थांना पटवून देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जराडवाडी (ता. बारामती) येथील विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले. साहित्यांची मिरवणूक वाजतगाजत श्रमदानाच्या ठिकाणी आल्यावर त्याठिकाणी साहित्यांची पूजा करून अभिनेते हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर यांनी श्रमदानास उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करून स्पर्धेत यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपले गांव पाणीदार करण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी रात्री बरोबर 12 वाजून 1 मिनिटाने श्रमदानास सुरुवात केली. पुढील येणारे 45 दिवस सर्व ग्रामस्थ श्रमदान करून आपले गांव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.