वाघोलीतील बाजारामध्ये चिखलाचे साम्राज्य : सुविधांचा ठणठणाट
वाघोली – येथे बाजारतळमध्ये परिसरातील सर्वात मोठा बाजार भरतो. बाजाराला पंचक्रोशीतील भाजीपाला विक्रेत्यांसह छोटेमोठे व्यापारी हजेरी लावतात. मात्र बाजार भरतो तो परिसर अतिशय चिखलमय, दुर्गंधीयुक्त झाला आहे. चिखल तुडवत ग्राहकांना बाजारहाट करावा लागत आहे. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वाघोली गाव हे मध्यवर्ती ठिकाणी असून बाजारतळ येथे पूर्वीपासून मोठा बाजार भरतो. वाढत्या नागरीकरणामुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही कल वाढला आहे. सकाळी, सायंकाळी शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. रोजचा भाजीपाला व माल विक्रेत्यांना सद्यस्थितीत तात्पुरते शेड उभारून दिले आहे. मात्र, पावसाळ्यात शेडचा उपयोग होत नाही. त्यामुळे व्यापारी, शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होते. ग्रामपंचायतीकडून अत्याधुनिक शेडसाठी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून काम सुरू आहे. परंतु सद्यस्थितीत बाजारतळमध्ये चिखल, कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, एका बाजूचे पाणी महामार्गाच्या खालून पाईपद्वारे बाजार भरतो. त्याठिकाणी काढून दिल्यामुळे अजूनच दुरवस्था आहे.
कोटींचा लिलाव; सुविधा शून्य
बाजार लिलाव 1 कोटी 28 लाखांमध्ये गेला आहे. यामध्ये दैनंदिन 50 लाख तर आठवडे बाजार 78 लाख, असा एकूण 1 कोटी 28 लाख रुपये लिलावातून ग्रामपंचायतीला मिळाले असतांना सुविधांबाबत दुर्लक्ष केले जात आहे. पाणी, स्वच्छतागृह, लाईट आदी मुलभूत सुविधा नसल्यामुळे मोठी कुचंबना होत आहे. बाजाराचा लिलाव कोटीच्यावर गेला असतांना देखील सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे. वेगाने विस्तारलेल्या वाघोली परिसरातील हा सर्वात मोठा बाजार गैरसोयीच्या गर्तेत सापडला आहे.
सध्यस्थितीत बाजारतळामधून वाहत असलेले पाणी बंद करण्यासाठी लवकरच पाईप टाकून पुढे ते ड्रेनेजला जोडण्यात येणार आहेत.
-मधुकर दाते, ग्रामविकास अधिकारी, वाघोली.