पाणी प्रश्न कायमचा सोडविण्याचे दिले ग्रामस्थांना आश्वासन
यवत- खोर (ता. दौंड) गावाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.5) भेट देत तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. खोर व देऊळगावगाडा दोन्ही गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी पुरंदर सिंचन योजनेमधून बंदिस्त पाइपलाइन करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. पद्मावती तलाव व फरतडे वस्ती तलावात जनाई-शिरसाई योजनेचे कायमस्वरूपी पाणी सोडण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. यानुसार या दोन्ही गावांचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना सर्व माहिती घेतली. टॅंकर दोन दिवसाने येत असल्याचे ग्रामस्थांनी शरद पवार यांना सांगितले. त्याचवेळी आणखी शासकीय टॅंकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पवार यांनी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना केल्या. ग्रामस्थांनी चारा छावणी ऐवजी चारा डेपो सुरू करा, अशी मागणी केली. परंतु, पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की, या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो परंतु या सरकारचे चारा डेपो ऐवजी चारा छावणी सुरू करण्याचे धोरण असल्याचे म्हणाले.
पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले की, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने केले होते. त्यावेळी खडकवासला धरणात एक टीएमसी पाणीसाठा असतानाही त्यांनी दौंड शहरासाठी अर्धा टीएमसी पिण्यासाठी पाणी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणले होते. आता, खडकवासला धरणात तीन ते चार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे शहरातील नागरिकांना दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे. मात्र, इकडे मुळा-मुठा व भीमा नदी कोरडीठाक पडली आहे. उभी पिके जळून चालली असताना पाण्याचे नियोजन नाही.
यावेळी दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, कॉंग्रेस आयचे माजी तालुकाध्यक्ष पोपटराव ताकवणे, सभापती राणी शेळके, सभापती ताराबाई देवकाते, उपसभापती प्रकाश नवले, जि.प. सदस्य गणेश कदम, पं. स. सदस्य नितीन दोरगे, भानुदास नेवसे, रामचंद्र चौधरी, झुंबर गायकवाड, गुरुमुख नारंग, इंद्रजित जगदाळे, लक्ष्मण दिवेकर, तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे, खोरचे सरपंच सुभाष चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश शिंदे यांनी केले.